
डोंबिवलीतील उंबरली गावात शुक्रवारी रात्री एक थरारक घटना घडली, ज्यामुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली होती. मानपाडा रोड परिसरातील एका घरात तब्बल नऊ फूट लांबीचा अजगर शिरल्याने परिसरात खळबळ उडाली. मात्र, सर्पमित्रांनी तात्काळ धाव घेऊन या अजगराला सुरक्षित रेस्क्यू करत नैसर्गिक अधिवासात सोडले. त्यामुळे गावकरी आणि वन विभागाला दिलासा मिळाला आहे.

डोंबिवली पूर्वेकडील उंबरली गावात राहणारे हितेश पाटील यांच्या घरात शुक्रवारी रात्रीच्या वेळी हा महाकाय अजगर आढळून आला. या घरामध्ये अजगर शिरल्याचे लक्षात येताच पाटील कुटुंबाला मोठा धक्का बसला.

यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पाटील कुटुंबाने जराही वेळ न घालवता तात्काळ सेवा ट्रस्टला या घटनेची माहिती दिली. ही माहिती मिळताच सेवा ट्रस्टचे कार्यकर्ते आणि सर्पमित्र पुर्वेश कोरी, सुभाष पंडियन आणि ओजस ठोंबरे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली.

या सर्पमित्रांनी अत्यंत दक्षता आणि कौशल्यपूर्ण पद्धतीने सुमारे ९ फूट लांबीच्या या अजगराला सुरक्षितपणे पकडले. अजगराला पकडल्यानंतर सेवा ट्रस्टच्या अध्यक्षांनी तातडीने कल्याण वन विभागातील अधिकारी राजू शिंदे यांना याची माहिती दिली.

वन विभागाचे संजय साबळे यांच्या सूचनांनुसार, पकडलेल्या या अजगराला कोणतीही इजा न होता, त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून देण्यात आले. सर्पमित्रांच्या या कामगिरीमुळे उंबरली गावातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.