
हल्ली बदलत्या काळात अनेकजण चमचा किंवा काट्याचा वापर करून जेवतात. विशेषतः तरुणांमध्ये याची क्रेझ जास्त दिसते. पण तुम्हाला माहित आहे का, की हाताने जेवणे हे केवळ आपली भारतीय संस्कृतीच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. आरोग्य तज्ञ आणि आयुर्वेद देखील हाताने जेवण्याला प्राधान्य देतात. यामुळे नेमके कोणते फायदे होतात, ते जाणून घेऊया.

आयुर्वेदानुसार, हाताने जेवताना बोटे तोंडाच्या वरच्या भागाला स्पर्श करतात. यामुळे पचनशक्ती सुधारते. हातावर असलेले चांगले बॅक्टेरिया जेवणासोबत तुमच्या पोटात जातात. ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. हाताने जेवल्याने शरीरातील एंजाइम्स उत्तेजित होतात, ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

जे लोक चमच्याने किंवा काट्याने खातात, त्यांचा जेवणाचा वेग हाताने जेवणाऱ्यांपेक्षा जास्त असतो. घाईघाईत खाल्ल्याने टाइप-२ मधुमेह (Type 2 diabetes) होण्याचा धोका वाढतो. हात वापरून जेवताना आपण हळू खातो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

हाताने जेवताना स्नायूंचा चांगला व्यायाम होतो. यामुळे हातातील रक्तभिसरण सुधारते आणि हाताचे सांधे मजबूत होतात. ही पद्धत स्नायूंची लवचिकता टिकवण्यासाठी देखील फायदेशीर आहे.

आपले हात नैसर्गिक तापमान सेन्सरसारखे काम करतात. चमचा वापरून जेवताना आपल्याला जेवण किती गरम आहे, याचा अंदाज येत नाही. पण हाताने जेवल्याने आपण अन्नाला स्पर्श करतो, ज्यामुळे ते खाण्यासाठी योग्य तापमानाचे आहे की नाही, हे समजते. ज्यामुळे जीभ पोळण्याचा धोका टळतो.

हाताने जेवल्याने स्पर्श, वास आणि चव या संवेदनांना चालना मिळते. ज्यामुळे जेवण अधिक आनंददायी वाटते. तुम्ही तुमच्या अन्नाशी एक भावनिक नाते जोडता आणि तुम्ही किती खात आहात, यावर लक्ष तुम्हाला लक्ष ठेवता येते. त्यामुळे जास्त खाणे टाळता येते.

अनेक संस्कृतींमध्ये हाताने जेवणे ही एक जुनी परंपरा आहे. हाताने जेवल्याने आपण आपल्या वारसा आणि सांस्कृतिक मुळांशी जोडले जातो. पण हाताने जेवण करण्याचे फायदे तेव्हाच मिळतात, जेव्हा तुमचे हात पूर्णपणे स्वच्छ असतील.

प्रत्येक वेळी जेवण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुणे खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून कोणतेही जंतू पोटात जाणार नाहीत आणि फूड पॉयझनिंगसारख्या समस्यांपासून बचाव होईल. हाताने जेवण करणे हे केवळ एक जुनी सवय नसून, आधुनिक जीवनशैलीतही आरोग्यदायी आणि सोयीस्कर पर्याय आहे.