शेतकऱ्याने शासकीय अधिकाऱ्याला चप्पल मारली, कर्मचाऱ्यांचे आंदोलन..
एका ज्येष्ठ शेतकऱ्याने शासकीय अधिकारी चपलांनी चांगलाच झोडपून काढला आहे.शेतकऱ्यांना वेड्यात काढणाऱ्या अधिकाऱ्याला अशा प्रकारे चपलेने चोपून काढल्याने राज्यात ही घटना वाऱ्यासारखी पसरली आहे..

बागलकोट टाऊन डेव्हलपमेंट अथॉरिटी ( BTDA) च्या अधिकाऱ्याला एका शेतकऱ्याने जमीन संपादनात नुकसान भरपाई प्रकरणात न्याय न मिळाल्याने त्याच्या केबिनमध्ये जाऊन चप्पल डोक्यात मारल्याची घटना शेजारील कर्नाटक राज्यात शनिवारी घडली.या प्रकरणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या प्रकरणानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन करीत न्याय देण्याची मागणी केली आहे.

शासकीय कार्यालयात खेटे मारून मारून थकलेल्या शेतकरी बसवराज दोड्डामणी यांनी त्याच्या जमिनीची नुकसान भरपाई न मिळाल्याने बागलकोट टाऊन डेव्हलपमेंट अथॉरिटी ( BTDA) च्या ऑफीसरला डोक्यावर चप्पल मारली. त्यानंतर नीलकंठ अंकड यांनी या वयोवृद्ध शेतकऱ्याला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि ते आतील केबिनमध्ये पळून गेले. शेतकरी बसवराज दोड्डामणी यांची जमीन दादेनावर सर्कल येथील बागलकोटला रस्त्यासाठी साल २००४ मध्ये संपादीत करण्यात आली होती.

मात्र, गेली २२ वर्षे खेटे मारुनही नुकसान भरपाई न मिळाल्याने वैतागलेल्या बसवराज दोड्डामणी यांनी आज बैठक सुरु असताना केबिनमध्ये शिरत अंकड यांच्या डोक्यात चप्पल घातली. त्यानंतर या वेळी दलित संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी BTDA च्या कार्यालयात घोषणाबाजी केली. यावेळी बागलकोट टाऊन डेव्हलपमेंट अथॉरिटीने पारदर्शकपणे नुकसान भरपाई द्यावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली.

शेतकऱ्यांना वेड्यात काढणाऱ्या या अधिकाऱ्याला चपलेने चोपून काढल्यापासून राज्यात ही घटना वाऱ्यासारखी पसरली आहे. कोणत्याही बाबतीत सहनशीलतेची एक सीमा असते, ती पार झाल्यानंतर अशाच घटना घडू शकतात असे म्हटले जात आहे. या हल्ल्यामुळे बागलकोटमधील नवनगर पोलीस स्टेशनसमोर बीटीडीएच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. याबद्दल बोलताना, नगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रकाश शेट्टी म्हणाले, "आज आम्ही बीटीडीए कार्यालयात मालकी हक्कपत्र वाटप कार्यक्रम आयोजित केला होता.याप्रसंगी अनेक लाभार्थी आले होते आणि काही संघटनांचे कार्यकर्तेही आले होते.

शेतकरी बसप्पा दोड्डामणीही आले होते आणि नीलकंठ अंकड आमच्यासोबत होते.जेव्हा बसप्पाने माझ्या कामाचे काय झाले असे विचारले ? तेव्हा या बैठकीचा तुझ्या कामाशी काहीही संबंध नाही असे सांगूनही त्याने अचानक माझ्यावर हल्ला केला.त्याची जमीन संपादित झाली आहे, त्याला नुकसान भरपाई मिळाली आहे हे खरे आहे, पण भावांमध्ये हा जमिनीचा वाद आहे. त्याने नुकसान भरपाईसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.अशा परिस्थितीत, कोणताही सरकारी अधिकारी काहीही करू शकत नाही असे नगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रकाश शेट्टी यांनी सांगितले.

जर त्यांनी या प्रकरणात कोणतीही प्रक्रिया पुढे नेली, तर तो कायद्याचा भंग ठरेल. त्यासंदर्भात कोणताही अधिकारी काहीही करण्याच्या स्थितीत नाही. पण बसप्पा वारंवार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे येऊन नुकसान भरपाई मागत आहेत. शेतकऱ्याच्या या प्रकरणाचा हल्ला झालेल्या कर्मचारी नीलकंठ अंकड यांच्याशी काहीही संबंध नाही. कारण शेतकऱ्याच्या जमिनीचे प्रकरण अंकड यांच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. मात्र, या हल्ल्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि आम्ही त्याबद्दल तक्रार दाखल केली आहे,अध्यक्ष प्रकाश शेट्टी यांनी सांगितले.