
जळगाव जिल्ह्यातील किनोद येथे धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.

गायत्री ज्ञानेश्वर कोळी असे मयत महिलेचे नाव असून मृत महिला ही 26 वर्षांची होती.

दरम्यान ही आत्महत्या नसून विवाहितेची सासू आणि ननंद यांनी तिचा गळा दाबून खून केल्याचा गंभीर आरोप मृत विवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे.

"गायत्रीला मासिक पाळी आली होती. या काळात तिने स्वयंपाक केला होता, तो स्वयंपाक तिच्या सासू आणि इतरांना चालत नव्हता. यावरून किरकोळ वाद झाला होता," असं मृत महिलेच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.

तसेच, "हा वाद विकोपाला गेल्याने सासू आणि नणंद यांनी तिला मारझोड केली आणि गळा दाबून खून केला. खून केल्यानंतर महिलेने आत्महत्या केल्याचा बनाव रचण्यात आला. त्यासाठी महिलेच्या गळ्यात साडी बांधून तिला लटकवून दिले", असाही मोठा दावा मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर महाराष्ट्रभरातून संताप व्यक्त केला जातोय. सासरच्या दोषींवर गुन्हा करावा, अशी मागणी गायत्री यांच्या कुटुंबियांनी केली आहे.