पत्नीच्या संपत्तीवर पतीचा हक्क किती? कोर्टाच्या निर्णयाने अनेकांची झोप उडवली
हिंदू महिलेला माहेरून मिळालेल्या मालमत्तेवर तिच्या मृत्यूनंतर पतीचा हक्क असेल का? आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने यावर महत्त्वाच्या निकाल दिला आहे, त्याची सोप्या शब्दांत माहिती जाणून घेऊया

हिंदू महिलांना त्यांच्या आई-वडिलांकडून मिळालेल्या मालमत्तेबाबत आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. जर एखाद्या हिंदू महिलेचा मृत्यू झाला आणि तिला मुले नसतील, तर तिच्या माहेरच्या मालमत्तेवर पतीचा कोणताही अधिकार राहणार नाही, असे कोर्टाने म्हटले आहे.

एका आजीने २००२ मध्ये आपली मालमत्ता एका नातीला दिली होती. मात्र, २००५ मध्ये त्या नातीचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर, आजीने ती मालमत्ता आपल्या दुसऱ्या नातीला देऊन टाकली.

याला पहिल्या नातीच्या पतीने विरोध केला आणि त्या मालमत्तेवर आपला हक्क असल्याचा दावा केला. यानंतर हे प्रकरण हायकोर्टात पोहोचले. यात कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यावर पतीचा दावा फेटाळून लावला.

न्यायमूर्ती तरलाधा राजशेखर राव यांनी या निकालात हिंदू उत्तराधिकार कायदा, १९५६ मधील कलमांचा आधार घेतला. कोर्टाच्या म्हणण्यांनुसार, जर एखाद्या महिलेला तिच्या माहेरून (आई किंवा वडिलांकडून) मालमत्ता मिळाली असेल आणि तिला स्वतःचे अपत्य नसेल, तर अशी मालमत्ता तिच्या पतीला मिळत नाही.

अशा परिस्थितीत, ती मालमत्ता पुन्हा तिच्या वडिलांच्या वारसांकडे (माहेरच्या लोकांकडे) परत जाते. त्या मालमत्तेच्या व्यवहारांवर पतीला आक्षेप घेण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार उरत नाही.

याबद्दल हायकोर्टाने स्पष्ट केले की, मृत नातीच्या पतीला त्या मालमत्तेवर कोणताही वारसाहक्क मिळालेला नाही. त्यामुळे, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संबंधित मालमत्ता याचिकाकर्त्याच्या (दुसऱ्या नातीच्या) नावावर करावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.