वाईट नजरेपासून घराचे रक्षण करायचंय? मग प्रवेशद्वारावर आठवणीने काढा हे चिन्ह!
घराच्या मुख्य दरवाजाला कुंकू किंवा शेंदूर लावल्याने नक्की काय होते, याचे वास्तुशास्त्रानुसार महत्त्व आणि फायदे काय, हे या लेखात सविस्तर जाणून घ्या.

अनेकांच्या घराच्या मुख्य दरवाजावर शेंदूर किंवा कुंकवाचा टिळा लावलेला आपण पाहतो. विशेषतः हनुमानाला अर्पण केलेला शेंदूर प्रवेशद्वाराला लावण्याची जुनी परंपरा आहे. पण वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार याचे नेमके काय फायदे होतात, ते जाणून घेऊया.

हिंदू धर्मात मुख्य दरवाजाला कुंकू लावणे अत्यंत पवित्र मानले जाते. यामुळे घराचे प्रवेशद्वार शुद्ध होते. तसेच बाहेरील नकारात्मक ऊर्जा, दृष्ट किंवा अशुभ शक्ती घरात प्रवेश करू शकत नाहीत. कुंकू हे शक्तीचे प्रतीक आहे, जे घरासाठी एक संरक्षक कवच म्हणून काम करते.

वास्तुशास्त्रानुसार, मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा मुख्य स्रोत असतो. दरवाजावर शेंदूर आणि तेलाचा टिळा लावल्याने तेथील ऊर्जेचे संतुलन राखले जाते. जर घराच्या प्रवेशद्वारात काही दोष असतील. तर या उपायामुळे त्या दोषांचा प्रभाव कमी होऊन सकारात्मकता वाढते.

मुख्य दरवाजाला देवी लक्ष्मीचे प्रवेशद्वार मानले जाते. प्रवेशद्वार सुशोभित आणि पवित्र ठेवल्याने लक्ष्मी प्रसन्न होते, अशी श्रद्धा आहे. यामुळे घरात धनधान्याची कमतरता भासत नाही. तसेच कुटुंबात सुख-शांती नांदते.

अनेकजण दरवाजावर कुंकवाने स्वस्तिक किंवा ओम ही चिन्हे काढतात. ही चिन्हे श्री गणेशाचे प्रतीक मानली जातात. यामुळे घरातील अडथळे दूर होतात आणि शुभ कार्यांत यश मिळते.

मुख्य दरवाजावर शेंदूर लावल्याने घराला कोणाचीही वाईट नजर लागत नाही. हे एक प्रकारचे आध्यात्मिक संरक्षण असून कुटुंबातील सदस्यांचे बाहेरील अनिष्ट प्रभावांपासून रक्षण करते.