
सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये कर्णधार रोहित शर्मा फ्लॉप ठरला. पहिल्या डावात 15 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या रोहितकडून दुस-या डावात चांगली कामगिरी अपेक्षित होती. दुसऱ्या डावातही 43 धावा करून रोहित बाद झाला. हिटमॅनला चांगली सुरुवात झाली पण त्याचे मोठ्या डावात रूपांतर करण्यात तो अपयशी ठरला. याआधीही रोहित न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये काही विशेष करू शकला नाही.

आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या युवा सलामीवीर शुभमन गिलची बॅट डब्ल्यूटीसी फायनलमध्येही शांत राहिली. आयपीएलच्या 16व्या आवृत्तीत सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप पटकावणारा गिल पहिल्या डावात 13 धावा करून बाद झाला, तर दुसऱ्या डावात त्याच्या बॅटने 18 धावा काढल्या. दुसऱ्या डावात तो वादग्रस्तपणे बाद झाला.

गेल्या अनेक महिन्यांपासून इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळत असलेल्या चेतेश्वर पुजाराकडून संघाला खूप आशा होत्या. पुजारा काऊंटीमध्ये शतके ठोकत होता पण डब्ल्यूटीसी फायनलमध्ये कांगारूंनी त्याला जास्त वेळ टिकू दिलं नाही. पहिल्या डावात 14 धावा करणारा पुजारा दुसऱ्या डावात 27 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

विराटने पहिल्या डावात 14 धावा केल्या तर दुसऱ्या डावात 49 धावा करून तो बाद झाला. दुसऱ्या डावात पाचव्या दिवशी विराटकडून संघाच्या अपेक्षा होत्या. तोही चांगल्या लयीत दिसत होता पण खराब शॉट खेळून तो बाद झाला. विराट हा एक मोठा मॅचविनर खेळाडू आहे पण WTC फायनलमध्ये त्याने निराशा केली.

यष्टिरक्षक श्रीकर भरतला मिळालेल्या संधीचे सोनं करता आलं नाही. जखमी ऋषभ पंतच्या जागी भारताची पहिली पसंती यष्टीरक्षक म्हणून निवड करण्यात आली होती, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्येही संधी देण्यात आली होती. मात्र या संधीचा फायदा भरतला करता आला नाही. पहिल्या डावात 5 धावा करणारा भरत दुसऱ्या डावात 23 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.