रस्त्यात अंत्ययात्रा दिसणे अशुभ की शुभ? सौभाग्यवती स्त्रीची अंत्ययात्रा दिसणं तर…
रस्त्यात अंत्ययात्रा दिसणे अशुभ नसून अत्यंत शुभ मानले जाते. शकुन शास्त्रानुसार अंत्ययात्रा दिसल्यास कोणते उपाय करावेत आणि त्याचे काय धार्मिक महत्त्व आहे, जाणून घ्या सविस्तर.

मृत्यू हे जगातील सर्वात मोठे आणि अटळ सत्य आहे. या पृथ्वीवर जन्म घेतलेल्या प्रत्येक सजीवाचा मृत्यू निश्चित आहे. हिंदू धर्मात सांगितलेल्या मानवी जीवनातील १६ संस्कारांमध्ये अंतिम संस्काराला अत्यंत विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व दिले गेले आहे. सामान्यतः, जेव्हा एखाद्या व्यक्तीचे निधन होते, तेव्हा तिचा अंतिम प्रवास म्हणजेच अंत्ययात्रा काढली जाते.

अनेकदा नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेर पडताना किंवा प्रवास करताना आपल्याला रस्त्यावरून जाणारी अंत्ययात्रा दिसते. अशा वेळी अनेक लोकांच्या मनात एक प्रकारची भीती किंवा अंधश्रद्धा असते की, मृतदेह दिसल्याने त्यांचा संपूर्ण दिवस खराब होईल किंवा काहीतरी अशुभ घडेल.

परंतु, हिंदू श्रद्धा आणि शुभशकुनांनुसार, रस्त्यावर अंत्ययात्रा दिसणे अशुभ नसून उलट ते अत्यंत शुभ मानले जाते. शुकन शास्त्राच्या नियमांनुसार, जर तुम्ही एखाद्या अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी, नोकरीच्या मुलाखतीसाठी किंवा व्यावसायिक करारासाठी (Business Deal) घराबाहेर पडला असाल आणि वाटेत अंत्ययात्रा दिसली, तर ते त्या कामात यश मिळण्याचे लक्षण असते.

असे मानले जाते कि, मृत व्यक्ती जाताना तुमच्या मार्गात येणारे सर्व अडथळे आणि नकारात्मक ऊर्जा स्वतःसोबत घेऊन जाते, ज्यामुळे तुमचे काम निर्विघ्नपणे पार पडते. जेव्हा कधी रस्त्यावरून अंत्ययात्रा जाताना दिसेल, तेव्हा आपले वाहन किंवा पावले काही क्षणांसाठी थांबवावीत.

मृत व्यक्तीच्या पार्थिवाला हात जोडून मनापासून वंदन करावे. असे केल्याने मृत आत्म्याविषयी आदर व्यक्त होतो आणि शास्त्रानुसार प्रवासातील दोष दूर होतात. अशी धार्मिक श्रद्धा आहे की मृत्यूनंतर आत्मा परमेश्वराच्या आश्रयाला जातो, त्यामुळे अंत्ययात्रा पाहणे हे देवाच्या आशीर्वादासारखेच आहे.

अंत्ययात्रा जवळून जाताना दोन मिनिटे मौन बाळगावे आणि मनातल्या मनात 'राम नाम सत्य है' किंवा गायत्री मंत्राचा जप करावा. यामुळे मृत आत्म्याला शांती मिळते आणि जप करणाऱ्या व्यक्तीला मोठे पुण्य प्राप्त होते. जर अंत्ययात्रा ओळखीच्या व्यक्तीची असेल, तर तिच्या पार्थिवाला खांदा देणे हे महापुण्य मानले गेले आहे.

धार्मिक परंपरेनुसार, जर रस्त्यावरून एखाद्या सौभाग्यवती किंवा श्रीमंत स्त्रीची अंत्ययात्रा जात असेल, तर ती साक्षात लक्ष्मीजींचेच एक रूप मानली जाते. अशी अंत्ययात्रा दिसल्यास स्त्रियांनी आपल्या अखंड सौभाग्यासाठी आणि घरात निरंतर सुख-समृद्धी राहण्यासाठी प्रार्थना करावी.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)