
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील निम गावात देवीच्या मूर्तीच्या डोळ्यांतून पाणी येत असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना समोर आल्यानंतर याला देवीचा चमत्कार समजून दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

निम गावात एकलव्य नवरात्र मंडळाने कालिका मातेच्या मूर्तीची स्थापना केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरती करत असतानाच अचानक देवीच्या मूर्तीच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागल्याचा प्रकार समोर आला.

यामुळे परिसरात या घटनेची मोठी चर्चा सुरू झाली. हा चमत्कार असल्याचा दावा अनेकजण करत आहेत. मात्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावर शास्त्रीय कारण देत स्पष्टीकरण दिले आहे.

समितीचे राज्य स्वयं कार्यवाह, विश्वजीत चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा चमत्कार नसून वातावरणातील काही घटकांमुळे मूर्तीच्या डोळ्यांतून पाणी येत आहे. वातावरणामध्ये बाष्प असल्याने ते मूर्तीच्या चेहऱ्याच्या रंगामध्ये मिसळून चेहऱ्यावरून पाण्याचे ओघळ दिसत आहेत.

या स्पष्टीकरणानंतरही, देवीच्या डोळ्यांतून अश्रू येण्याचे तंतोतंत शास्त्रीय कारण अद्याप समजू शकलेले नाही.

दरम्यान, टीव्ही ९ मराठी या वृत्ताची किंवा या घटनेची पुष्टी करत नाही.