
अभिनेत्री काजोलची बहीण तनिषा मुखर्जी आणि अभिनेता-निर्माता उदय चोप्रा यांचं रिलेशनशिप जगजाहीर होतं. एकेकाळी हे दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते आणि लग्नही करणार होते. परंतु एका कारणामुळे त्यांचा ब्रेकअप झाला.

त्यांच्या ब्रेकअपमागचं कारण उदय चोप्राची एक अट असल्याचं म्हटलं गेलं होतं. ही अट होती प्री-नुप्टियल अग्रीमेंटची. म्हणजेच लग्नाआधीच घटस्फोटानंतरच्या देण्या-घेण्याविषयीचा करार करणं. यावर आता तनिषाने मौन सोडलं आहे. या सर्व गोष्टींना तिने 'बकवास' असं म्हटलंय.

तनिषाने नाराजी व्यक्त करत सांगितलं, "तुम्ही मला असा प्रश्न विचारत आहात, यावर माझा विश्वासच नाही. बकवास, सर्वकाही बकवास आहे. मी उदय आणि त्याच्या कुटुंबीयांचा खूप आदर करते. त्यामुळे मी याबद्दल काहीच बोलणार नाही."

'जे लोक त्याचा आदर करतात, त्यांना ही गोष्ट माहीत असेल की सर्वकाही बकवास आहे. परंतु एकंदरीत आमचं नातं चांगलं होतं आणि काही नाती कायमची टिकत नाहीत', असं ती पुढे म्हणाली. ब्रेकअपनंतर उदयच्या संपर्कात नसल्याचंही तिने स्पष्ट केलं.

"मला माझ्या एक्स-लव्हर्सच्या संपर्कात राहायला खूप अवघड वाटतं. एकदा कोणी एक्स बनलं की तो कायमचा एक्सच राहतो. ज्या नात्यांना मीडिया हायलाइट करतं, प्रेक्षकसुद्धा त्यातच अधिक रस घेतात. जर मीडियाने तुम्हाला सुंदर जोडी म्हणून दाखवलं, तर प्रेक्षकसुद्धा तसंच मानतात", असं मत तनिष्काने मांडलंय.