गाणं पाहिजे तर असं, पुन्हा-पुन्हा ऐकलं तरी मन भरत नाही, ज्याची परदेशातही होती प्रचंड चर्चा
17 वर्षांपूर्वी या गाण्याने सोशल मीडियावर परदेशातही घातला होता धुमाकूळ. आजही या गाण्याचे आहेत प्रचंड चाहते. ऐकदा ऐकलं तर लोक पुन्हा-पुन्हा ऐकतात.

बॉलिवूडमधील रोमँटिक गाण्यांचा विषय निघाला की अनेक दिग्गज गायकांसोबत पाकिस्तानी गायक आतिफ असलम यांचे नावही आवर्जून घेतले जाते. आपल्या वेगळ्या आणि भावपूर्ण आवाजामुळे त्यांनी भारतीय प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे.

त्यांच्या गाण्यांना भारतासह परदेशातही मोठी लोकप्रियता मिळाली आहे. आतिफ असलम यांनी बॉलिवूडमध्ये ‘जहर’ चित्रपटातील ‘वो लम्हें’ या गाण्याद्वारे पदार्पण केले होते. हे गाणे प्रचंड गाजल्यानंतर त्यांच्या आवाजाची जादू अनेक चित्रपटांत पाहायला मिळाली.

मात्र 2009 साली प्रदर्शित झालेल्या ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या चित्रपटातील ‘तू जाने ना’ या गाण्याने त्यांना वेगळीच ओळख मिळवून दिली. रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांची जोडी या चित्रपटातून प्रथमच प्रेक्षकांसमोर आली. रोमँटिक-कॉमेडी शैलीतील या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

चित्रपटातील ‘तेरा होने लगा हूँ’, ‘आ जाओ मेरी तमन्ना’, ‘प्रेम की नैया’ यांसारखी गाणीही लोकप्रिय ठरली. मात्र ‘तू जाने ना’ हे गाणे सर्वाधिक गाजले. या गाण्यात एकतर्फी आणि अपूर्ण प्रेमाची भावना अत्यंत सुंदरपणे मांडण्यात आली आहे.

अनेक वर्षांनंतरही हे गाणे सोशल मीडियावर आणि यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात पाहिले व ऐकले जात आहे. 2009 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही लोकप्रिय असून तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.