‘किती बकवास गाणं’ म्हणत दिग्दर्शकाने दिला नकार, मात्र, रिलीज होताच ठरलं सुपरहिट, 31 वर्षानंतरही ट्रेंडमध्ये
'किती बकवास गाणं आहे' म्हणत 31 वर्षांपूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शकाने दिलेला नकार. मात्र, एका आठवड्यात बदल केल्यानंतर असं काही घडलं, की चित्रपट प्रदर्शित होताच गाणं ठरलं प्रचंड सुपरहिट.

31 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 1942: A Love Story या चित्रपटातील गाणी आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. विशेषतः 'कुछ ना कहो' आणि 'प्यार हुआ चुपके से' ही गाणी आजही सदाबहार मानली जातात.

मात्र, या गाण्यांच्या निर्मितीमागे अनेक रंजक किस्से दडलेले आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी हा किस्सा सांगितला आणि उपस्थितांनाही जुन्या आठवणींमध्ये नेले.

या कार्यक्रमातील सर्वात मोठा खुलासा झाला तो 'कुछ ना कहो' या गाण्याबद्दल. हे गाणे संगीतकार R. D. Burman यांनी तयार केले होते. पण सुरुवातीला हे गाणे ऐकल्यानंतर विधू विनोद चोप्रा यांना ते अजिबात आवडले नव्हते. पहिल्या बैठकीत आर. डी. बर्मन यांनी हे गाणे अतिशय वेगवान बीटमध्ये सादर केले होते. ते ऐकून विधू हैराण झाले होते.

त्या काळात काही लोक आर. डी. बर्मन यांचा काळ संपल्याची टीकाही करत होते. मात्र, विधू यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की चित्रपटाचा आत्माच संगीत असतो आणि संगीत प्रभावी नसेल तर अल्बमही चालणार नाही. त्यांनी थेट आर. डी. बर्मन यांना हे गाणे पूर्णपणे चुकीचे असल्याचे सांगितले. हे ऐकून पंचम दा दुखावले गेले, पण त्यांनी हार न मानता एका आठवड्याची मुदत मागितली.

एका आठवड्यानंतर आर. डी. बर्मन यांनी पुन्हा विधूंना बोलावले. सुरुवातीला विधूंना वाटले की पुन्हा तेच होणार, पण यावेळी काहीतरी वेगळे घडले. आर. डी. बर्मन हार्मोनियमसमोर बसले आणि त्यांनी कुछ ना कहो ची सुरुवातीची धून वाजवली. ती धून ऐकताच विधू विनोद चोप्रा भारावून गेले. त्यांना त्यात महान संगीतकार S. D. Burman यांच्या शैलीची झलक जाणवली.

आर. डी. बर्मन यांनीही गंमतीने त्या धूनला वडिलांची मालमत्ता असे म्हटले होते. त्या एका आठवड्यात त्यांनी गाण्याला पूर्णपणे नवा आत्मा दिला आणि त्यातून हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अजरामर गीत जन्माला आले. आजही 'कुछ ना कहो' आणि 'प्यार हुआ चुपके से' ही गाणी संगीतप्रेमींच्या प्लेलिस्टमध्ये कायम ऐकायला मिळतात.