राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचं निधन झालं. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ते एक पत्रकार, विचारवंत, हिंदुत्वाचे भाष्यकार, तरुण भारत या वृत्तपत्राचे ते माजी मुख्य संपादक होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते माजी बौद्धिक प्रमुख आणि प्रचार प्रमुखही होते.
मा. गो. वैद्यांना पत्रकारिता व समाजसेवेचे अनेक पुरस्कार मिळाले होते. मॉरिस कॉलेजमध्ये असताना 1943 सालापासूनच मा. गो. वैद्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक होते.
1948 साली गांधी हत्येनंतर संघावर बंदी आली, त्यावेळी त्यांनी भूमिगत राहून काम केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माहिती देणारे ’सुगम संघ’ नावाचे हिंदी पुस्तक मा. गो. वैद्यांनी लिहिले आहे.
त्यांच्या निधनाची माहिती होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत मा. गो. वैद्य यांच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगत, त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, यांनीही ट्विट करत मा. गो. वैद्य यांना श्रद्धांजली वाहिली.