
महाराष्ट्र केसरीच्या ६६ व्या स्पर्धेमध्ये सिकंदर शेख याने विजय मिळवत मानाची गदा पटकावली आहे. फायनलमध्ये गतविजेत्या शिवराज राक्षेचा पराभव करत पठ्ठ्याने मैदान मारलं आहे.

पुण्यातील फुलगाव येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये फायनल सामन्यात सिकंदरने शिवराज राक्षे याला चीतपट केलं. अवघ्या काही सेकंदामध्ये झोळी डाव टाकत सिकंदरने विजय मिळवला.

मागील वर्षीच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये शिवराजने महेंद्र गायकवाड याचा पराभव केलेला. तर सिकंदर शेख याचा सेमी फायनलमध्ये महेंद्रने पराभव केला होता.

सिकंदर शेख याने हार मानली नाही, मेहनत करत राहिला परत आखाड्यात उतरला आणि महाराष्ट्र केसरीची गदा जिंकून गेला. मोहोळ तालुक्यतील या मल्लाने शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवलाय.

सिकंदर शेख हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मधला रहिवासी आहेत. गंगावेश तालमीच्या पठ्ठ्याने अखेर महाराष्ट्र केसरीवर नाव कोरत जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला आहे.