
स्टार प्रवाह वाहिनीच्या 'ठरलं तर मग' मालिकेत लवकरच प्रेक्षकांना एक नवं वळण अनुभवायला मिळणार आहे. महाराष्ट्राची लाडकी जोडी अर्थातच अर्जुन-सायलीच्या भूमिकांची लवकरच अदलाबदली होणार आहे.

ऑफिसच्या कामाप्रमाणेच घरात दिवसभर राबणाऱ्या गृहिणीच्या कष्टांची दखल देखील घ्यायला हवी हेच एकमेकांना पटवून देण्याच्या हेतूने अर्जुन-सायलीने एकमेकांची कामं करण्याचा निश्चय केला आहे.

सायलीच्या कामाची जबाबदारी घेतलेला अर्जुन यापुढे स्वयंपाकघर आणि संपूर्ण घराची जबाबदारी खांदयावर घेणार आहे. तर सायली अर्जुनच्या भूमिकेत शिरून ऑफिस आणि कोर्टाच्या कामांची जबाबदारी स्वीकारणार आहे.

दोघांसाठीही हा अनुभव नवा असला तरी अनोखी शिकवण देणारा ठरणार आहे. नात्यातील समज, आदर आणि समानतेचं महत्त्व अधोरेखित करणारं मालिकेतलं हे वळण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात शंका नाही.

अर्जुन-सायलीसाठी व्हॅलेंटाइन डेसुद्धा खास ठरणार आहे. पहिलं काँट्रॅक्ट मॅरेज आणि एकमेकांच्या संमतीने झालेलं पहिलं लग्न 14 फेब्रुवारीलाच झालं होतं. त्यामुळे यंदाचा व्हॅलेंटाइन डे बदलेल्या भूमिकांसोबत ते साजरा करणार आहेत.