
द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील रानवड येथील संदीप जाधव या शेतकर्याने केशर आंब्याची शेती केली आहे. द्राक्ष हे पारंपारिक पीक घेत होते. पण कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटामुळे यातून हवे तसे उत्पन्न मिळत नव्हते.

शेतीत काहीतरी वेगळा प्रयोग करावा म्हणून गुजरात येथील केशर आंब्याला राज्यात चांगली मागणी असल्याने सहा एकरावरील द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवत आठ ते नऊ लाख रुपये खर्च करत केशर आंब्याची 5 हजार झाडांची लागवड केली.

चार वर्षानंतर गेल्यावर्षी 15 टन केशर आंब्याचे उत्पादन हाती आले. यातून अकरा लाख रुपयांचे उत्पन्न झाले.

यंदा आंब्याला चांगला मोहर आला असून काही झाडांना आंबे सुद्धा मोठ्या प्रमाणात येण्यास सुरुवात झालेला आहे.

दोन महिन्यात आंब्याचे उत्पादन सुरू होणार असल्याने केशर आंबा या पिकातून 60 ते 70 टनापर्यंत उत्पन्न हाती येईल.

या शेतीमधून जाधव यांना 30 ते 40 लाख रुपयांचे उत्पन्न येण्याची अपेक्षा करत या आंब्यातून लखोपती होण्याचे स्वप्न आंबा उत्पादक शेतकरी संदीप जाधव बघत आहेत.