
भाजपच्या नगरसेविका रितू तावडे यांनी आज महापौरपदाचा पदभार संभाळला. 44 वर्षानंतर मुंबई महापालिकेत विराजमान होणाऱ्या त्या भाजपच्या दुसऱ्या महापौर आहेत. त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संजय घाडी यांनी उपमहापौरपदाची शपथ घेतली.

मुंबई महापालिकेची निवडणूक तीन वर्षांपासून रखडली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने नवीन वर्षात 2026 रोजी ही निवडणूक पार पडली. मुंबई महापालिकेत महायुतीच शासन असणार आहे. केंद्र, राज्यापाठोपाठ आता मुंबई महापालिकेतही भाजप-शिवसेना सत्तेवर आली आहे.

मुंबई महापालिका निवडणूक भाजप-शिवसेनेने युती म्हणून लढवली होती. महापालिकेत भाजपचे सर्वाधिक 89 आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक आहेत. दोघांचं मिळून संख्याबळ 118 आहे. बहुमतापेक्षा चार जागा जास्त आहेत.

रितू तावडे यांनी आज मुंबई महापालिकेत महापौरपदाचा पदभार स्वीकारला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रेक्षक गॅलरीत उपस्थित होते. मुंबईत आपला महापौर बसवण्याचं भाजपचं अनेक वर्षापासूनच स्वप्न साकार झालं.

आज महापौर पदाची जबाबदारी सांभाळण्याच्या पहिल्याच दिवशी रितू तावडे यांच्यासमोर काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी गोंधळ घातला. हे नगरसेवक आक्रमक झाले होते. बोलण्याची संधी मिळाली नाही म्हणून या नगरसेवकांचा पारा चढला होता.