
नाशिकच्या निफाड तालुक्यात ब्रिटिश कालीन नांदूर मधमेश्वर धरण आहे. 1916 मध्ये हे धरण बांधले गेले. या धरणाच्या इतिहासात प्रथमच जून महिन्यात 12.53 टीएमसी पाणी विसर्ग केला आहे. जायकवाडीच्या दिशेने गोदावरी नदीतून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

नांदूर मधमेश्वर धरण बांधल्यापासून जून महिन्यात पाण्याचा विसर्ग झालेला नाही. यावर्षी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, नाशिक आणि निफाड तालुक्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच अवकाळी व मान्सूनपूर्व दमदार पाऊस झाला. त्यानंतर जून महिन्यात मान्सूनच्या पावसाने चांगली हजेरी लावली.

नाशिक जिल्ह्यातील दारणा, गंगापूर, कडवा आणि पालखेड धरणाची पाणीपातळी 60 टक्क्यांच्या वर गेली. यामुळे या धरणांमधूनही पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. नांदूर मधमेश्वरच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाली आहे.

नांदूर मधमेश्वर धरणातून जून महिन्यात पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. सोमवारी सकाळपर्यंत 12.53 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांत नाशिक जिल्ह्यात पावसाने उघडीप जरी दिली आहे. परंतु नांदूर मधमेश्वर धरणात आवक सुरु आहे.

जायकवाडी धरणाची क्षमता तब्बल 102 टीएमसी पाणीसाठ्याची आहे. हे धरण एकदा पूर्ण भरले तर दोन वर्षाच्या शेतीच्या पाण्याची आणि 4 वर्षांच्या पिण्याची पाण्याची सोय होते.

जायकवाडी धरणासाठी नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडले जाते. आता गोदावरी खोऱ्यात पाऊस होत राहिला तर पाणी जायकवाडी धरणात पाणी सोडले जाणार आहे. यामुळे जायकवाडी धरण यंदा 100 टक्के भरण्याची शक्यता आहे.