Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’चा टीझर जबरदस्त पण नेटकऱ्यांना खटकल्या काही गोष्टी; व्यक्त केली नाराजी
रितेश देशमुखची मुख्य भूमिका असलेल्या 'राजा शिवाजी' या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्याचं कौतुक केलंय, तर काहींनी खटकलेल्या गोष्टी बोलून दाखवल्या आहेत.

गेल्या दहा वर्षांपासून अभिनेता रितेश देशमुखने ज्या चित्रपटाचं स्वप्न पाहिलं होतं, अखेर ते साकार झालं आहे. येत्या 1 मे रोजी 'राजा शिवाजी' हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. रितेशच्या या चित्रपटाच्या टीझरमधील काही गोष्टी काही नेटकऱ्यांना खटकल्या आहेत.

अभिनेता संजय दत्तच्या भूमिकेवर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. संजय दत्त प्रत्येक भूमिकेत एकसारखाच अभिनय करतो. त्यात काही वेगळेपण दिसत नाही, असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. या चित्रपटातही तो खलनायकाच्या भूमिकेत आहे.

रितेशच्या या चित्रपटात हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. यामध्ये अभिषेक बच्चनने संभाजी शहाजीराजे भोसले यांची भूमिका साकारली आहे. अभिषेक बच्चनचीही निवड काही नेटकऱ्यांना खटकली आहे.

संभाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझल खान यांची मूळ प्रतिमा दिसत नाही. कास्टिंग चांगली नाही, अशी प्रतिक्रिया एकाने दिली आहे. तर संजय दत्तला प्रत्येक चित्रपटात घेणं गरजेचं असतं का, असा सवाल दुसऱ्याने केला आहे.

टीझर तर फार छान वाटतोय पण बऱ्याच कलाकारांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत बघितल्यामुळे रितेश देशमुख कुठेतरी कमी पडतोय, असं वाटतंय, असंही मत एका नेटकऱ्याने मांडलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी काही जणांनी दुसऱ्या अभिनेत्याचं नाव सुचवलं आहे.

टीझरवर कमेंट करत काही नेटकऱ्यांनी शरद केळकरचं नाव सुचवलं आहे. शरद केळकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका चोख साकारली असती, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. शरदने 'तान्हाजी: द अनसंग वॉरिअर' या चित्रपटात महाराजांची भूमिका साकारली होती.

संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद जोशी, अमोल गुप्ते, जिनिलिया देशमुख , आणि रितेश देशमुख यांसारख्या कलाकारांची फळी या चित्रपटात एकत्र आली आहे.

दहा वर्षे एका महाकाय स्वप्नाला उराशी बाळगून ते सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला. लक्षात आलं.. छत्रपती शिवाजी महाराज नावाचं हे आकाश जितकं दिसतं त्यापेक्षा कितीतरी भव्य आहे, अशा शब्दांत रितेशने भावना व्यक्त केल्या आहेत.