
रस्त्यावरून प्रवास करताना वाहतुकीचे नियम पाळणे ही केवळ शिस्त नसून ती एक सामाजिक जबाबदारी असत. अनेकदा घाईघाईत किंवा दुर्लक्षामुळे आपण आपत्कालीन वाहनांचा, विशेषतः रुग्णवाहिकेचा मार्ग अडवतो.

मात्र, तुमची ही एक चूक आता तुम्हाला कायदेशीर कचाट्यात अडकवू शकते. केंद्र सरकारने रुग्णवाहिकेसारख्या आपत्कालीन वाहनांना रस्ता न देणाऱ्या वाहनचालकांसाठी अत्यंत कडक नियमावली तयार केली आहे.

मोटार वाहन कायद्यातील सुधारणांनुसार, जर एखादा चालक रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाच्या गाड्यांसारख्या आपत्कालीन वाहनांना जाण्यासाठी जागा करून देत नसेल, तर तो गंभीर गुन्हा मानला जातो.

कलम १९४-ई अंतर्गत अशा चालकांवर खालीलप्रमाणे कारवाई होऊ शकते. पहिल्याच वेळेस नियम मोडल्यास १०,००० रुपयांपर्यंत मोठा दंड आकारला जातो. केवळ दंड भरून तुमची सुटका होणार नाही; तर गुन्ह्याचे गांभीर्य पाहून ६ महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते.

वारंवार असे उल्लंघन केल्यास संबंधित चालकाचा ड्रायव्हिंग लायसन्स (DL) रद्द करण्याची तरतूद देखील कायद्यात आहे. रुग्णवाहिकेचा सायरन हा धोक्याचा इशारा असतो. त्यामध्ये असलेला रुग्णासाठी तो गोल्डन अवर म्हणजेच उपचारासाठीचा अत्यंत महत्त्वाचा वेळ असू शकतो.

रस्ता मिळण्यास झालेला अवघ्या काही मिनिटांचा उशीर हा त्या रुग्णाच्या जीवावर बेतू शकतो. त्यामुळे सायरन ऐकताच आपल्या गाडीचा वेग कमी करून किंवा गाडी डाव्या बाजूला घेऊन रुग्णवाहिकेला मोकळा मार्ग करून देणे हे प्रत्येक वाहनचालकाचे कर्तव्य आहे.

अनेक संस्था या संदर्भात सातत्याने जनजागृती करत असतात. त्यांच्या मते, रस्त्यावरील अडथळ्यांमुळे दरवर्षी अनेक रुग्ण वेळेवर उपचार न मिळाल्याने प्राण गमावतात. हे टाळण्यासाठी 'रुग्णवाहिकेला आधी वाट' हे ब्रीदवाक्य प्रत्येक चालकाने पाळणे गरजेचे आहे.

वाहतूक नियम हे केवळ दंड टाळण्यासाठी नसून मानवी जीव वाचवण्यासाठी आहेत. त्यामुळे रस्त्यावर गाडी चालवताना थोडी संवेदनशीलता दाखवा. तुमचा एक छोटासा निर्णय कोणाचे तरी प्राण वाचवू शकतो.