
devendra fadnavis

मोरगिरीतील शाळेत व्यवस्था करण्यात आलेल्या दरडग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी फडणवीस आणि दरेकर पोहोचले. त्यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला आणि आपल्या समस्या विरोधी पक्षनेत्यांपुढे मांडल्या. फडणवीस यांनीही नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. तसंच त्यांच्या सगळ्या मागण्यांसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करु असं आश्वासनही फडणवीस यांनी यावेळी दिलं.

इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकरांनी दरडग्रस्तांसोबत खाली बसून शाळेतच जेवण केलं. जे जेवण पूरग्रस्तांसाठी देण्यात येतं, त्यातीलच जेवण फडणवीस आणि दरेकर यांनी स्वत:ही खाल्लं.

फडणवीसांसमोर आपल्या व्यथा मांडताना पूरग्रस्त नागरिकांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यावेळी फडणवीसांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. तसंच आम्ही तुम्हाला सर्वतोपरी मदत मिळवून देऊ असं आश्वासनही त्यांनी या नागरिकांना दिलं.

आपल्याला भविष्यात येणाऱ्या अडचणी हे दरडग्रस्त फडणवीस आणि दरेकरांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत होते. फडणवीस आणि दरेकरांनीही त्यांच्या प्रत्येक अडचणी, समस्या जाणून घेतल्या. तसंच त्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं

“हे नुकसान मोठं आहे. सर्वांचं पुनर्वसन होणे गरजेचं आहे. शेती आणि घरांचं मोठं नुकसान झालं आहे. नव्याने घर बांधून त्यांना जागा द्यावी लागेल. त्यांना त्यांची पसंती पाहून जागा द्यावी लागेल. अशा घटनांच्या वेळी मिळणारी मदत तोकडीच असते. पण त्यांना वाढीव मदत मिळणं अपेक्षित आहे. तात्पुरती नाही तर शक्य ती मदत परमनंट करावी लागेल”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.