
पुण्यात गुरुवारी झालेल्या पावसामुळे पाण्याचा प्रश्न मिटला आहे. एकाच दिवसात चार ही धरणात साडे तीन टीएमसी पाणी जमा झाले आहे. पुढील तीन महिने पाणी पुरले इतका पाणीसाठा एकाच दिवसात जमा झाला आहे.

पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर धरण भागात गुरुवारी पर्जन्यवृष्टी झाली. तर खडकवासला धरणातून यंदा पाच वर्षांतील सर्वाधिक विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गुरुवारी पुण्यात हाहा:कार उडला होता.

पुणे शहरात गुरुवारी झालेल्या पावसामुळे मुठा नदीपात्र पाण्याने तुडुंब भरले. पावसामुळे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मोरया गोसावी मंदिराला पाण्याने पूर्णपणे वेढा घातला होता.

पवना धरण क्षेत्रात आणि पिंपरी चिंचवड शहरात सुरू असलेला दमदार पावसामुळे पवना नदीच्या पात्रात पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती. त्यामुळे मोरया गोसावी मंदिर पाण्याखाली गेले होते.

शुक्रवारी मोरया गोसावी मंदिरामधील पाणी हळूहळू कमी होऊ लागले आहे. आता मंदिर दिसू लागले आहे. भाविक मंदिरात येत आहे. मंदिरातील स्वच्छता केली जात आहे.

पुण्याच्या खेड तालुक्यातील चास कमान धरण क्षेत्रातील पावसाचा वाढता जोर व पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेता धरणातील पाणी साठा नियंत्रित करणेकरिता सांडवाद्वारे 6030 क्युसेक्स क्षमतेने विसर्ग भीमा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.