
इथिओपियात हेली गुब्बी नावाच्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. हा ज्वालामुखी तब्बल 12 हजार वर्षांनंतर सक्रीय झाला आहे. या ज्वालामुखीतून बाहेर आलेली राख हजारो किलोमीटरचा प्रवास करून थेट भारतापर्यंत आल आहे.

याच राखेमुळे चीन, पाकिस्तान, भारत, येमेन यासारख्या देशांना पर्यावरणविषयक धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे जगभरातील विमान वाहतुकीवरही त्याचा परिणाम झालेला आहे. असे असतानाच ज्वालामुखीतून निघालेली राख विमानांना नेमकं काय करू शकते, हे जाणून घेऊ या....

ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या राखेत धूर आणि काही कण असतात. ही राख हजारो किलोमीटरचा प्रवास करते. त्यामुळेच हवामानावर परिणाम पडतो. तापमानात घट होते. ज्वालामुखीतून निघालेल्या राखेत सिलिका, लोह, मॅग्नेशियम या धातूंचे बारिक कण असतात. हे कण विमानासाठी अतिशय धोकादायक असे मानले जातात.

विमानाचे इंजिन प्रत्येक सेकंदाला साधारण एक टन हवा आतमध्ये ओढते. हवेत ज्वालामुखीतून निघालेल्या राखेचे कण असतील तर हे कण थेट विमानात जातात. मॅग्नेशियम, लोह यांचे कण थेट विमानाच्या इंजिनमध्ये जाऊन बसू शकतात. त्यामुळे हवेतच इंजिन बंद होण्याचा धोका असतो.

त्यामुळेच ज्वालामुखीची राख, धूर विमानांसाठी फार धोकादायक असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच जगभरातील 9 व्होल्कॅनो अॅश अॅडव्हायजरी सेंटर ज्वालामुखी आणि वातावरणातील ज्वालामुखीचा धूर यावर लक्ष ठेवत असतात. जेव्हा जेव्हा ज्वालामुखीची राख 20 हजार फूट उंच जाते तेव्हा लगेच या अॅडव्हायजरी सेंटरकडून त्या परिसरातून जाणाऱ्या विमानांना सूचना देते. त्यामुळे विमान अपघात होत नाही.