
पोलीस भरतीमध्ये मदत करण्याच्या बहाण्याने राजापूर तालुक्यातील मोरोशी येथील एका २८ वर्षीय तरुणाला तब्बल ४ लाख ९० हजार ९०६ रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.

या प्रकरणी लवेश यशवंत कानडे यांनी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्ञानेश वसंत पांचाळ असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ज्ञानेश पांचाळ याने लवेश कानडे याला आपण विजय सुतार नावाच्या एका आर्मी ऑफिसरला ओळखतो. तो पोलीस भरतीसाठी मदत करू शकतो, असे आमिष दाखवले होते.

यानंतर डिसेंबर २०२० ते १२ ऑगस्ट २०२४ या दरम्यान पांचाळने वेळोवेळी गुगल पे द्वारे लवेशकडून एकूण ४ लाख ९० हजार ९०६ रुपये उकळले.

जेव्हा लवेश कानडे याने पांचाळकडे पैशांबाबत विचारणा केली, तेव्हा तो टाळाटाळ करू लागला. आज-उद्या पैसे देतो, अशी खोटी आश्वासने देऊ लागला.

अखेरीस फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्रस्त झालेल्या लवेश कानडे याने राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन ज्ञानेश पांचाळ विरोधात तक्रार दाखल केली.

पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या तरुणाची अशाप्रकारे फसवणूक झाल्याने त्याचे स्वप्न भंगले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.