Raja Shivaji : या 5 चुकांनी बिघडवला रितेश देशमुखचा खेळ; अन्यथा ‘राजा शिवाजी’ बनला असता मास्टरपीस
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटात काही उणिवा आहेत, ज्याकडे दुर्लक्ष करता येऊ शकत नाही. अनेकदा भव्य कलाकृती करण्याच्या नादात त्यातलं नेमकं मर्म उलगडण्यात कसर राहते. मांडणी-तंत्रातली भव्यता अनेकदा आशय हरवून बसते, अशी काहीशी जाणीव 'राजा शिवाजी' पाहताना येते.

कमकुवत स्क्रीनप्ले- कथा ही कुठल्याही चित्रपटाची मजबूत बाजू असते, स्क्रीनप्ले तगडा नसेल, तर ही चित्रपटाची सर्वांत कमकुवत बाजू ठरते. छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य असंख्य घटनांनी भरलेलं होतं, परंतु 'राजा शिवाजी'मधील काही सीन्स गरजेपेक्षा अधिक खेचल्यासारखे वाटतात. यामुळे चित्रपटाच्या गतीवर त्याला परिणाम झाला आहे. चित्रपटाची पटकथा आणि मांडणी बांधेसूद करण्यावर अधिक भर द्यायला हवा होता, असं वाटतं.

व्हीएफएक्स आणि ग्राफिक्स- प्रेक्षकांनी याआधी 'बाहुबली', 'आरआरआर' यांसारख्या मोठमोठ्या चित्रपटांमध्ये उच्च दर्जाचे व्हीएफएक्स पाहिले आहेत. तर दुसरीकडे 'राजा शिवाजी'मधील व्हिएफएक्स थोडे फिके ठरतात. युद्धाच्या मैदानातील काही सीन्स काही ठिकाणी बनावटी वाटतात. या चित्रपटातील भव्यता नाकारता येणार नाही, परंतु त्या तुलनेत ऐतिहासिक कथानकाची गरज म्हणून जिथे व्हीएफएक्सचा वापर केला जातो, तिथे भव्यतेचा हा दर्जा कायम ठेवता आलेला नाही. अफजलखानाच्या क्रोर्याची परिसीमा दाखवण्यासाठी दोन हत्तींमधील झुंजीचा प्रसंग दाखवण्यात आला. परंतु या प्रसंगातील सुमार व्हीएफएक्स दुर्लक्ष करता येण्यासारखं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा वावर ज्या किल्ल्यांमध्ये दाखवला आहे, तो प्रतापगड आणि राजगडही पुरेशा प्रभावीपणे दिसत नाहीत.

मुख्य भूमिकांचं कॅरेक्टरायझेशन- रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी शारीरिक मेहनत खूप केली आहे, यात काही शंकाच नाही. परंतु चित्रपटाची स्क्रिप्ट त्याला भावूक क्षणांना अधिक खोलवर दाखवण्याची संधी कमी देते. सहाय्यक भूमिका, विशेषत: अफजल खानशिवाय इतर खलनायकी भूमिकांना आणखी मजबूत आणि क्रूर दाखवता येऊ शकलं असतं.

संवाद- छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट म्हटल्यावर त्यातील संवादांवर टाळ्यांचा कडकडाट झालाच पाहिजे, अभिमानाने ऊर भरून आला पाहिजे. 'राजा शिवाजी'मधील संवाद चांगले आहेत, परंतु थिएटरमधून बाहेर पडल्यानंतरही डोक्यात घुमू लागतील, एवढा त्यात दम नाही. भाषा आणि प्रभावशाली संवाद हे ऐतिहासिक चित्रपटांच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचे ठरतात.

संगीत- अजय-अतुल या जोडगोळीचं संगीत या चित्रपटाचा आत्मा आहे. परंतु काही सीन्सवर पार्श्वसंगीत अधिक हावी होतो आणि काही ठिकाणी तो एकदमच शांत होतो. शौर्य, ऊर्जा, अभिमान अशा भावना प्रेक्षकांच्या मनात जागृत करण्यासाठी संगीत हे प्रभावी माध्यम ठरतं.

'राजा शिवाजी'मध्ये काही उणिवा असूनही रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांच्या संघर्षाचं अत्यंत प्रामाणिकपणे चित्रण केलं आहे. मराठा साम्राज्य स्थापन करण्याचा त्यांचा संघर्ष आणि आई जिजाऊ यांच्यासोबतचं त्यांचं नातं यामध्ये सुंदरपणे टिपलं आहे.