
अवघ्या आठवडाभरावर रक्षाबंधनाचा सण आला आहे. येत्या ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन पार पडणार असून यानिमित्ताने सध्या बाजारात लगबग पाहायला मिळत आहे. रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.

यानिमित्ताने बहिणी आपल्या भावांसाठी सुंदर राख्या निवडत असतात. तर भाऊ आपल्या लाडक्या बहिणींच्या संरक्षणाचे वचन देत राखी मनगटावर बांधून घेतात. अनेकजण बांधलेली राखी वर्षभर आपल्या मनगटावर ठेवतात.

पण ही राखी वर्षभर ठेवणं योग्य असते का? राखी किती दिवस हातात बांधावी? गेल्या वर्षी बांधलेल्या जुन्या राखीचे काय करावे? असा प्रश्न अनेकदा आपल्याला पडतो. आज आपण यामागचे उत्तर जाणून घेणार आहेत.

राखी किती दिवस हाताला बांधलेली ठेवावी, याबद्दल वेगवेगळ्या धार्मिक मान्यता आहेत. काही मान्यतेनुसार, रक्षाबंधनाच्या २४ तासांच्या आत राखी काढून टाकावी. तर काही ठिकाणी जन्माष्टमीपर्यंत राखी ठेवण्याची प्रथा आहे. या दोन्ही वेळेत राखी काढणे शुभ मानले जाते.

पण धार्मिकदृष्ट्या पितृपक्ष सुरू होण्यापूर्वी राखी काढून टाकणे महत्त्वाचे आहे. कारण पितृ पक्षात कोणतीही शुभ गोष्ट हातावर ठेवणे अशुभ मानले जाते. तसेच गेल्या वर्षीची राखी काढून टाकणे शुभ मानले जाते.

अनेकदा आपण जुनी राखी काढल्यानंतर कुठेही फेकून देतो, पण असे करणे अपवित्र मानले जाते. राखी हे बहिण-भावाच्या प्रेमाचे आणि पवित्र नात्याचे प्रतीक आहे, त्यामुळे तिचा अपमान करणे योग्य नाही.

जुनी राखी कोणत्याही परिस्थितीत कुठेही फेकून देऊ नये. जुनी राखी काढल्यानंतर ती सन्मानपूर्वक विसर्जित करणे किंवा तिचा योग्य प्रकारे वापर करणे आवश्यक असते. जुनी राखी वाहत्या नदी, तलाव किंवा स्वच्छ पाण्यात विसर्जित करणे सर्वात उत्तम मानले जाते. ही राखी विसर्जन करतेवेळी तिच्यासोबत एक नाणेही ठेवावे.

जर तुमच्या घराच्या आजूबाजूला नदी, तलाव नसेल तर तुम्ही ती कोणत्याही झाडाखाली किंवा बागेतील मातीमध्ये गाडू शकता. तसेच राखीचे विसर्जन करणे शक्य नसेल तर तुम्ही ती एखाद्या पवित्र झाडाच्या फांदीला बांधू शकता.

जर तुमची राखी तुटली असेल, तर ती थेट फेकून देऊ नका. त्याऐवजी, तिला एका लाल रंगाच्या स्वच्छ कपड्यात गुंडाळून सुरक्षित ठिकाणी ठेवा. त्यानंतर योग्य वेळी विसर्जित करा.

जर तुम्ही सोन्याची किंवा चांदीची राखी वापरली असेल, तर ती वर्षभर हातावर ठेवण्यास काहीही अडचण नाही. या राख्या पवित्र धातूंनी बनलेल्या असल्यामुळे त्या अशुभ मानल्या जात नाहीत. त्या तुम्हाला दागिन्यांप्रमाणे वापरता येतात. यामुळे तुमचं नातं अधिक दृढ होण्यास मदत होते आणि धार्मिक परंपरेचा मानही राखला जातो.