
धावपळीच्या जीवनात जेवणाच्या वेळा पाळणं हे खरंच एक मोठं आव्हान आहे. पण आपल्यापैकी अनेक लोकांना नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण करण्याची योग्य वेळ कोणती? हेच माहीत नसतं. त्यामुळे आज आपण योग्य वेळी जेवण कधी करावं याबद्दलची माहिती घेणार आहोत.

योग्य वेळी जेवण केल्यास आपले शरीर निरोगी राहते. तसेच थकवा, तणाव, चिडचिड अशा समस्यांपासून मुक्ती मिळते. आपण सर्वांनी शाळेत जाणाऱ्या मुलांकडून जेवणाची योग्य वेळ पाळायला शिकावं. कारण मुले वेळेवर खातात. त्यामुळेच त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास चांगला होतो. तसेच त्यांच्या शरीरात नेहमी ऊर्जा (एनर्जी) टिकून राहते.

नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्त्वाचा आहार आहे. नाश्ता हा कायम सकाळी ७ ते ८ वाजेदरम्यान नाश्ता करावा. दररोज सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांच्या आत काहीतरी हलका आहार घ्यावा. नाश्ता वेळेत केल्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते. पण सकाळी १० वाजेनंतर नाश्ता करणे टाळावे.

दुपारचं जेवण शरीराला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा देतं. जेवण करण्यासाठी दुपारी १२.३० ते २ ही योग्य वेळ असते. यादरम्यान जेवण करावे. नाश्ता आणि दुपारचं जेवण यामध्ये किमान ४ तासांचं अंतर असणं गरजेचं आहे. यामुळे पहिला आहार व्यवस्थित पचतो. दुपारी ४ वाजल्यानंतर जेवण करु नये.

रात्रीचं जेवण हलकं असावं आणि झोपेच्या वेळेनुसार घ्यावं. साधारणपणे संध्याकाळी ६ ते ८ वाजेदरम्यान जेवण करणे सर्वात उत्तम समजले जाते. झोपण्याच्या ३ तास आधी जेवण करणे आवश्यक आहे. यामुळे अन्न व्यवस्थित पचतं. तसेच चांगली झोप लागते. रात्री ९ नंतर जेवण करणे टाळावे.

जर तुम्ही दररोज याच योग्य वेळी अन्न खाल्लं तर तुमचे शरीर नेहमी निरोगी राहते. शरीराला ठराविक वेळी अन्न मिळाल्यास शरीराची पचनशक्ती (मेटाबॉलिज्म) वाढते. तसेच थकवा, तणाव आणि चिडचिड अशा मानसिक समस्या दूर होतात.

तुम्ही योग्य वेळी जेवण केलात तर तुम्ही आनंदी व उत्साही राहता. याउलट, रोज चुकीच्या आणि वेगवेगळ्या वेळी खाल्ल्यास तुमचे शरीर अशक्त होऊ शकते. योग्य वेळी आणि नियमितपणे जेवण केल्यास तुम्ही अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांपासून दूर राहू शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)