
ऑपरेशन सिंदूरच्यावेळी सर्वच शस्त्र यशस्वी ठरली. पण एका अस्त्राने सर्वात अद्वितीय कामगिरी केली ते म्हणजे S-400. रशियन बनावटीच्या या S-400 एअर डिफेन्स सिस्टिमच्या पाच रेजिमेंटची भारताने 2018 मध्ये ऑर्डर दिली होती. एकूण 5.43 अब्ज डॉलर्सचा हा सर्व व्यवहार आहे.

ऑपरेशन सिंदूर लॉन्च झाल्यानंतर पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.त्यांनी डागलेली ड्रोन्स, क्षेपणास्त्र S-400 एअर डिफेन्स सिस्टिमने हवेतच नष्ट केली. S-400 ने येणार्या रॉकेट्स, फायटर जेट्सचा अचूक माग काढला. पाकिस्तानच्या आतमध्ये खोलवर घुसून पाकिस्तानी जेट्स पाडली. हे शक्य झालं ते फक्त S-400 च्या रेंजमुळे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन उद्या भारत दौऱ्यावर येत आहेत. संरक्षण करारांच्या दृष्टीने हा दौरा खूप महत्वाचा आहे. पुतिन यांच्या भारत भेटीत भारत आणखी S-400 सिस्टिम विकत घेणार की, त्यापुढचं व्हर्जन S-500 एअर डिफेन्स सिस्टिम खरेदीचा करार होणार हा प्रश्न आहे.

S-400 ची रेंज 400 किलोमीटर पर्यंतची आहे. म्हणजे 400 किलोमीटर अंतरावरील कोणताही हवाई धोका या सिस्टिमद्वारे हवेतच नष्ट करता येतो. तेच S-500 ची रेंज 500 ते 600 किलोमीटर आहे. S-400 सिस्टिम 30 किलोमीटर उंचीपर्यंतच टार्गेट हेरुन नष्ट करते. S-500 सिस्टिम 180 ते 200 उंचीपर्यंत हवाई टार्गेट नष्ट करु शकते. ही उंची म्हणजे अवकाशाच्या जवळपासचा थर झाला.

फायटर जेट्स, अन्य विमानं, ड्रोन्स आणि क्रूझ मिसाइल्स S-400 सिस्टिमद्वारे नष्ट करता येतात. S-500 सिस्टिम त्यापुढे जाऊन लांब पल्ल्याची बॅलेस्टिक मिसाइल्स आणि हायपरसोनिक मिसाइल्सही नष्ट करु शकते. सध्या हायपरसोनिक मिसाइल रोखणारी जगातील एकमेव सिस्टिम म्हणजे S-500 आहे. चीन आणि पाकिस्तान सारखे देश हे तंत्रज्ञान मिळवण्याचा भरपूर प्रयत्न करत आहेत. त्यामुळे S-500 भविष्यासाठी तरतूद ठरेल.