41 वर्षे जुनी मालिका, जिच्या एका भागामुळे संतापलेले मुंबईतील टॅक्सी ड्रायव्हर, अभिनेत्रीच्या विरोधात केलेलं आंदोलन, कारण…
41 वर्षे जुनी मालिक, जिच्या एका भागामुळे प्रचंड संतापलेले मुंबईमधील टॅक्सी ड्रायव्हर. अभिनेत्रीच्या विरोधात रस्त्यावर उतरलेले लोक. नेमकं काय घडलेलं?

1980 आणि 1990 च्या दशकात दूरदर्शनवरील अनेक मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होत्या. ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘विक्रम-बेताळ’, ‘हातिम’ आणि ‘शक्तिमान’ यांसारख्या मालिकांनी मनोरंजन केले तर काही मालिकांनी समाजातील वास्तववादी प्रश्नांवर प्रकाश टाकत जनजागृतीचे कामही केले.

अशाच मालिकांपैकी एक होती दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांची गाजलेली ‘रजनी’. ‘रजनीगंधा’ आणि ‘छोटी सी बात’ यांसारखे यशस्वी चित्रपट दिल्यानंतर बासू चॅटर्जी यांनी दूरदर्शनकडे मोर्चा वळवला आणि 1985 मध्ये ‘रजनी’ ही मालिका प्रेक्षकांसमोर आणली.

या मालिकेत एका सामान्य गृहिणीची असामान्य कथा दाखवण्यात आली होती. समाजातील गैरप्रकारांविरोधात आवाज उठवणारी आणि इतरांना मदत करणारी ‘रजनी’ ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली.

मात्र, मालिकेच्या एका भागामुळे मोठा वाद निर्माण झाला. या भागात मुंबईतील काही टॅक्सीचालक प्रवाशांकडून जादा भाडे आकारतात आणि कमी अंतराच्या प्रवाशांना नकार देतात असे दाखवण्यात आले होते. या भागाचा उद्देश नागरिकांना जागरूक करणे हा असला तरी अनेक टॅक्सीचालकांनी याला विरोध दर्शवला.

या भागानंतर मुंबईतील 500 हून अधिक टॅक्सीचालकांनी संप पुकारल्याचे सांगितले जाते. तसेच अनेक चालकांनी दूरदर्शन कार्यालयाबाहेर निदर्शनेही केली. एका मालिकेतील भागामुळे एवढी मोठी प्रतिक्रिया उमटल्याने ‘रजनी’चा समाजावर किती प्रभाव होता हे दिसून आले.

वाद वाढल्यानंतर मालिकेच्या निर्मात्यांवर दबाव वाढला आणि अवघ्या 13 भागांनंतर ही लोकप्रिय मालिका बंद करण्यात आली. विशेष म्हणजे, मालिका संपण्यापूर्वी कलाकार आणि तांत्रिक टीमचा गौरव करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमादरम्यान अचानक गोंधळ आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचेही सांगितले जाते.