IPL 2024 : आरसीबी दिल्ली कॅपिटल्स सामन्यादरम्यान जेवणावरून गोंधळ, प्रकरण थेट पोलिसात; जाणून घ्या प्रकरण
आयपीएल 2024 स्पर्धेतील प्रत्येक सामन्याचा क्रीडाप्रेमी आनंद घेत आहेत. या पर्वात अनेक रंगतदार लढती चाहत्यांना पाहायला मिळाल्या. अतितटीच्या लढतीत आपल्या आवडत्या संघांनी बाजीही मारली. या पर्वात आरसीबीने शेवटच्या पर्वात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. सलग पाच सामने जिंकत आरसीबी प्लेऑफच्या शर्यतीत आहे. पण आपल्या आवडत्या संघाच्या सामन्यादरम्यान एका चाहत्यासोबत भलतंच घडलं.

आयपीएल 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला प्लेऑफमध्ये खेळण्याची संधी आहे. सलग पाच सामन्यात विजय मिळवत आरसीबीने दाखवून दिलं आहे. आरसीबीने शेवटचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध जिंकला. मात्र या सामन्यात असं काही घडलं की प्रकरण पोलिसात पोहोचलं आहे.

आरसीबीच्या सामन्यादरम्यान 23 वर्षीय तरुणाने केएससीए कँटिनमधून जेवणं खाल्लं. यावेळी त्याने तूप, भात, चना मसाला, रायता, कटलेट आणि गुलाबजामून मागवले होते. मात्र हे अन्न खाल्ल्यावर त्याची प्रकृती ढासळली आणि बेशुद्ध झाला, असं पोलिसात सांगण्यात आलं आहे.

"रात्री 9 च्या सुमारास मी मॅच पाहत असलेल्या स्टँडला जोडलेल्या कॅन्टीनमध्ये गेलो आणि गुलाबजामून, तूप भात, इडली, चना मसाला, कटलेट आणि रायता खाल्ले. दोन-तीन मिनिटांनंतर मला अस्वस्थ वाटू लागलं आणि पाच मिनिटांनंतर मी कोसळलो," असं संबंधित तरूणाने पोलिसांना सांगितले.

या घटनेनंतर कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन आणि कॅन्टिन मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. रिपोर्टनुसार, क्युबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

संबंधित 23 वर्षीत तरुणाला अन्नातून बिषबाधा झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. आता त्या चाहत्याची प्रकृती ठीक आहे. अन्नातून त्रास झाल्यानेच बेशुद्ध झाल्याचं सांगण्यात येत आहे.

आयपीएल सामने पाहण्यासाठी चाहते कितीही महाग तिकीट असलं तरी खरेदी करून सामन्याचा आनंद लुटत आहेत. चाहते सामन्यासाठी आपला वेळ आणि पैसाही खर्च करत आहेत. मात्र स्टेडियममध्ये जेव्हा नित्कृष्ट अन्न मिळतं तेव्हा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं.