
टीम इंडियाचा प्रशिक्षक राहुल द्रविड याने 2021 मध्ये टीम इंडियाची धुरा सांभाळली होती. वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासह हा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यामुळे प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ वाढवणार की दुसरं कोणाला संधी मिळणार? ही चर्चा रंगली आहे.

राहुल द्रविडच्या कार्यकाळात टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप, टेस्ट चॅम्पियनशिप आणि वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पराभवाचं तोंड पाहिलं आहे. आशिया कप स्पर्धेचं जेतेपद मिळवलं. पण आयसीसी चषकांचा दुष्काळ दूर करण्यात अपयश आलं.

राहुल द्रविड याला याबाबत विचारलं तेव्हा त्याने सांगितलं की, 'मी याबाबत काही विचार केलेला नाही. माझ्याकडे याबाबतीत विचार करण्यासाठी वेळ नव्हता. पण जेव्हा मला असं करण्याची संधी मिळेल तेव्हा मी करेन. आता माझं पूर्ण लक्ष्य वर्ल्डकपवर होतं. पुढे काय होईल हे मला माहिती नाही.'

मीडिया रिपोर्टनुसार, बीसीसीआयने कार्यकाळ वाढण्याबाबत द्रविडशी कोणतीही चर्चा केलेली नाही. राहुल द्रविड यांच्यासोबत असलेल्या सहकारी स्टाफचा कार्यकाळ वर्ल्डकपपर्यंतच होता.

ज्युनिअर क्रिकेटमध्ये राहुल द्रविडला प्रशिक्षक म्हणून यश मिळालं. पण टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या जबाबदारीत एकही स्पर्धा जिंकता आली नाही. द्रविडच्या कार्यकाळात अंडर 19 टीमने 2016 आणि 2018 चा वर्ल्डकप जिंकला होता.

प्रशिक्षक राहुल द्रविड याच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण आणि आशिष नेहरा यांच्या नावाची चर्चा आहे. आगामी टी20 वर्ल्डकप डोळ्यासमोर ठेवून लवकरच प्रशिक्षकपदाच्या नावाची घोषणा होईल. त्यामुळे बीसीसीआय काय निर्णय घेते, याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.