
टी20 वर्ल्डकप विजयानंतर रोहित शर्माच्या क्रिकेट कारकिर्दिला ग्रहण लागल्याचं दिसत आहे. टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर वनडे आणि कसोटी खेळत आहे. पण त्याच्या फलंदाजीची धार कमी झाल्याचं दिसत आहे. इतकंच काय तर त्याच्या कर्णधारपदाखाली पराभवाची मालिका सुरु असल्याचं दिसत आहे. त्यात मधल्या फळीत खेळण्याचा घेतलेला निर्णयही काही कामी आलेला नाही.

रोहित शर्मा सात वर्षानंतर मधल्या फळीत खेळत आहे. पण दोन्ही डावात त्याला एकेरी धावांवर तंबूत परतावं लागलं. मधल्या फळीत त्याच्यामुळे टीम इंडिया भक्कम होईल असं वाटत होतं. पण तसं काहीच झालं नाही. ॲडलेड कसोटीच्या पहिल्या डावात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना रोहितने 23 चेंडूंचा सामना केला आणि केवळ 3 धावा केल्या.

दुसऱ्या डावातही सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रोहित शर्माने 15 चेंडूंचा सामना केला आणि त्याला एका चौकारासह केवळ 6 धावा करता आल्या. म्हणजेच रोहितने या दोन डावात केवळ 9 धावा केल्या.

रोहित शर्मा दीर्घकाळापासून कसोटी क्रिकेटमध्ये खराब फॉर्मने त्रस्त आहे. 2022 पासून धावांच्या दुष्काळाचा सामना करत असताना, रोहितने गेल्या दोन वर्षांत खेळलेल्या 38 कसोटी डावांमध्ये केवळ 33 च्या सरासरीने 1226 धावा केल्या आहेत.

विशेषतः शेवटच्या 11 कसोटी डावांमध्ये रोहितचा फॉर्म खूपच खराब आहे. गेल्या 11 डावांमध्ये रोहितला 12.36 च्या सरासरीने केवळ 136 धावा करता आल्या आहेत. तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळणाऱ्या रोहितला 10 वेळा दुहेरी आकडा गाठता आलेला नाही.