
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील शेवटचा साखळी फेरीचा सामना भारत आणि नेदरलँड यांच्यात होणार आहे. भारताने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत भारताची गाठ न्यूझीलंडशी आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींचं टेन्शन वाढलं आहे.

20 वर्षानंतर टीम इंडियाने वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीत न्यूझीलंडचा पराभव केला. न्यूझीलंडवर 4 गडी राखून विजय मिळवला. पण आता पुन्हा एकदा भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना होणार आहे. बाद फेरीचा सामना असल्याने धाकधूक वाढली आहे.

आयसीसी स्पर्धांच्या बाद फेरीत टीम इंडियाने तीन वेळा न्यूझीलंडचा सामना केला आहे. 2000 साली आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम फेरीत लढत झाली होती. तेव्हा न्यूझीलंडने 4 गडी राखून विजय मिळवला होता.

2019 वनडे वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत दोन्ही संघ भिडले होते. तेव्हा न्यूझीलंडने भारताला 18 धावांनी पराभूत केलं होतं. यामुळे जेतेपदाचं स्वप्न भंगलं होतं.

2021 च्या टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत सामना झाला होता. या सामन्यातही न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखून पराभव केला होता. त्यामुळे पहिलं कसोटी जेतेपद जिंकण्याचं स्वप्न भंगलं होतं.

2023 वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना 15 नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारतं? याकडे क्रीडाप्रेमी लक्ष लावून आहेत.