
आयपीएलचं 17 पर्व पार पडली असून 18 व्या पर्वासाठी सर्वच संघ सज्ज झाले आहेत. आरसीबी आपल्या पहिल्या जेतेपदासाठी या पर्वात प्रयत्न करणार आहे. आरसीबी यंदा तरी जेतेपद मिळवेल का? याची उत्सुकता क्रीडाप्रेमींना आहे. असं असताना विराट कोहलीही पहिल्या जेतेपदासाठी सज्ज झाला आहे.

आयपीएल मेगा लिलावपूर्वी फ्रेंचायझीने विराट कोहलीला 21 कोटी रुपये देऊन संघात कायम ठेवलं आहे. त्यामुळे 18 व्या पर्वात विराट कोहली आरसीबीकडून खेळणार हे निश्चित झालं आहे. इतकंच काय तर पुढच्या तीन पर्वात आरसीबीकडून खेळणार हे निश्चित झालं आहे. याला विराट कोहलीने दुजोरा दिला आहे.

विराट कोहली म्हणाला की, इतकी वर्षे एका संघासाठी खेळेन असे कधीच वाटले नव्हते. पण हे नातं अनेक वर्षांपासून कायम आहे. खरंच माझ्यासाठी हा खूप खास अनुभव होता. माझ्या कारकिर्दीच्या अखेरीस 20 वर्षे होतील.मी ही 20 वर्षे आरसीबीसाठी लढणार आहे.

विराट कोहलीच्या या वक्तव्याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने घेतला जात आहे. आयपीएल 2027 पर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात राहणार असल्याचे विराट कोहलीने म्हटले आहे. यानंतर निवृत्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्याने आपल्या कारकिर्दीच्या अखेरीस 20 वर्षे पूर्ण होतील यावर भर दिला आहे.

35 वर्षीय विराट कोहली 2027 पर्यंत 38 वर्षांचा होईल. किंग कोहली या काळात सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा करण्याची शक्यता आहे. त्यामुळेच विराट कोहलीला येत्या तीन वर्षांत आरसीबीसाठी चषक जिंकून देण्याची इच्छा आहे. कोहलीचे हे स्वप्न आयपीएल 2025 मध्येच पूर्ण होईल का, याची प्रतीक्षा करावी लागेल.