
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाकडून चाहत्यांच्या आणि क्रिकेट दिग्गजांच्या सर्व अपेक्षा फोल ठरल्या. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांची दाणादाण उडवली.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 469 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकली. आपल्या अप्रतिम क्रिकेट टॅलेंटमुळे जागतिक क्रिकेटमध्ये ओळखले जाणारे टीम इंडियाचे क्रिकेटपटू सध्या पॅव्हेलियनमध्ये बसले आहेत.

डावाची सुरुवात करणाऱ्या रोहित आणि गिलने पहिल्या काही षटकांमध्ये चांगली फलंदाजी करत टीम इंडियाला चांगल्या सुरुवातीची आशा दिली होती, पण ती आशा जास्त काळ टिकली नाही.

कर्णधार या नात्याने संघाचा डाव सांभाळण्याची जबाबदारी असणाऱ्या रोहित शर्माने केवळ 15 धावा केल्या. ऑसी कर्णधार पॅट कमिन्सने रोहितला पायचीत केले.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या आणि ऑरेंज कॅप मिळवणारा शुभमन गिल या सामन्यात विशेष काही करू शकला नाही. या सामन्यापूर्वी गिलकडून खूप अपेक्षा होत्या. गिलला बोलंडने टाकलेला इनस्विंग चेंडू समजू शकला नाही आणि तो केवळ 13 धावांवर क्लीन बोल्ड झाला.

दोन सलामीवीरांच्या झटपट बाद झाल्यानंतर पुजाराकडून खूप अपेक्षा होत्या.इतर भारतीय खेळाडू आयपीएलमध्ये खेळत असताना केवळ पुजाराने ही फायनल डोळ्यासमोर ठेवून इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. काउंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पुजारा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात 14 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला.

माजी कर्णधार कोहलीही या तिघांपेक्षा काही वेगळं करू शकला नाही. कोहलीचा डाव अवघ्या 14 धावांत संपुष्टात आला. या सामन्यात कोहली शतक करेल अशी टीम इंडियाच्या चाहत्यांची अपेक्षा होती. कोहलीने आयपीएलमध्ये बॅक टू बॅक सेंच्युरी करत या फायनलमध्ये प्रवेश केला होता.