
मुंबईतील कार्टर रोड परिसरात बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी राहतात. पण 1950 च्या दशकात याठिकाणी पारशी आणि अँग्लो इंडियन समुदायाचे लोक अधिक होते. त्यावेळी अद्याप बॉलिवूड सेलिब्रिटी तिथपर्यंत पोहोचले नव्हते. इंडस्ट्रीतील फक्त दोन मोठ्या लोकांच्या मालकीचे दोन मोठे बंगले या परिसरात होते.

त्यापैकी एक संगीतकार नौशाद यांच्या मालकीचा ‘आशियाना’ हा बंगला इथे होता. तर दुसऱ्या बंगल्याचं नाव गेल्या अनेक वर्षांत बदललं गेलं. तरीही तो बंगला ‘आशीर्वाद’ या नावाने आजही ओळखला जातो. सुरुवातीला हा बंगला एका अँग्लो इंडियन कुटुंबाच्या मालकीचा होता.

1950 च्या सुरुवातीला अभिनेते भारत भूषण यांनी ही मालमत्ता विकत घेतली होती. पण या दशकाच्या अखेरीस त्यांचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले आणि ते कर्जबाजारी झाले होते. त्यामुळे त्यांना त्यांचा बंगला विकावा लागला होता. त्याचवेळी तो बंगला शापित किंवा पछाडलेला आहे अशा चर्चा होऊ लागल्या होत्या.

जो कोणी त्या बंगल्यात राहील त्याचं नुकसानच होईल, असं म्हटलं जात होतं. 1960 च्या दशकातील अभिनेते राजेंद्र कुमार यांना या बंगल्याबद्दल समजलं होतं. बंगल्याबद्दल पसरलेली अफवा आणि इतर चर्चांमुळे त्यावेळी तो फक्त 60 हजार रुपयांना उपलब्ध होता. त्यांनी त्यांच्या मुलीच्या नावावरून बंगल्याचं नाव ‘डिंपल’ असं ठेवलं.

मित्र मनोज कुमार यांच्या सांगण्यावरून त्यांनी घरावरील कथित शाप दूर करण्यासाठी पूजासुद्धा केली होती. राजेंद्र यांच्यासाठी तो बंगला भाग्यवान ठरला. कारण नंतर त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. पण भारत भूषण यांच्यासारखंच राजेंद्र कुमार यांनाही कठीण काळाचा सामना करावा लागला. अखेर मुख्य भूमिकांवरून सहाय्यक भूमिकांकडे वळताच त्यांना तो बंगला विकावा लागला.

70 च्या दशकात तो बंगला अभिनेते राजेश खन्ना यांनी विकत घेतला होता. त्यांचा ‘आशीर्वाद’ हा बंगला पर्यटकांसाठी जणू आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. मात्र या बंगल्यातील आधीच्या दोन अभिनेत्यांच्या नशिबाप्रमाणेच राजेश खन्ना यांचंही यश टिकू शकलं नाही.

2014 मध्ये हा बंगला एका उद्योगपतीला 90 कोटी रुपयांना विकला गेला. फेब्रुवारी 2016 मध्ये नवीन मालकाने त्याच्या जागी नवीन मालमत्ता बांधण्यासाठी तो बंगला पाडला. इथेच बॉलिवूडमधल्या तीन मोठ्या सेलिब्रिटींचं घर असलेल्या त्या बंगल्याचा प्रवास संपला.