पावसाळी ट्रिपचा विचारसुद्धा करू नका; राज्यातील ‘या’ पर्यटनस्थळांवर कडक बंदी, छुप्या मार्गाने गेलात तरी..
मान्सून सुरू होताच पर्यटक मोठ्या संख्येने अनेक निसर्गरम्य धबधबे, नद्या आणि समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी करतात. काही अतिउत्साही पर्यटक मद्यपान करून स्टंटबाजी करतात. या कारणांमुळे दरवर्षी अनेक दुर्दैवी घटना घडतात. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यावेळी कडक बंदी घातली आहे.

मुंबईसह कोकण तसंच घाट परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत घाट परिसरातील ताम्हिणी, लोणावळा, भिरा, महाबळेश्वर अशा काही ठिकाणी 24 तासांत 500 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस नोंदवला गेला आहे. यामुळे राज्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. पावसाळा सुरू होताच अनेक जण ट्रेकिंग आणि पावसाळी ट्रिपचं आयोजन करतात. मात्र त्यापूर्वी कुठे-कुठे बंदी आहे, ते जाणून घ्या..

अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण परिसरात पावसाचं तांडव पहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात याठिकाणी300 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस कोसळला आहे. तर घाटघर, रतनवाडी परिसरात ढगफुटी सदृश पाऊस आहे. यामुळे प्रशासनाकडून विशेष घबरदारी घेतली जात आहे. भंडारदरा धरण परिसरातील पर्यटनस्थळे बंद करण्यात आली आहेत. कळसूबाई शिखर, रतनवाडी, सांदन व्हॅली, परिसरातील गडांवर आणि धबधब्याखाली जाण्यास मनाई आहे.

पावसाळ्यात इगतपुरीला अनेकजण फिरायला जातात. मात्र इगतपुरीतील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. पिंपरी पाटा परिसरापासून सर्व प्रमुख पर्यटनस्थळांच्या मार्गांवर पोलिसांची कडक नाकाबंदी आहे. पुढील आदेशापर्यंत कोणत्याही पर्यटकाला पर्यटनस्थळी प्रवेश नाही. धबधबे, धरणे, किल्ले आणि इतर पर्यटनस्थळे पुढील 48 तासांसाठी बंद करण्यात आली आहेत. सर्व ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. छुप्या मार्गाने पर्यटनस्थळी जाणाऱ्यांवरही कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

वसई, नायगाव, वालीव, अर्नाळा, विरार, पेल्हार, मांडवी, बोळींज आणि नालासोपारा पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत येणाऱ्या पर्यटन स्थळांवरही मनाई आदेश लागू केला आहे. जो कोणी या नियमांचं उल्लंघन करणार, त्याच्याविरोधात कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. वसईमधील सुरूची, रानगाव, भुईगाव, बेनापट्टी, ब्राह्मण पाडा हे समुद्र किनारे, तसंच देवकुंडी, चिंचोटी धबधबा आणि राजावळी खदाण या ठिकाणीही जाण्यास बंदी आहे.

विरारमधील कुंभारपाडा तलाव, फुलपाडा डॅम, तुंगारेश्वर धबधबा, जेट्टी परिसर, तानसा नदी, पेल्हार धरण, अर्नाळा, राजोडी, कळंब, नवापूर या ठिकाणीही पर्यटकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. महाबळेश्वर, पाचगणीसह साताऱ्यातील अनेक ठिकाणं पुढचे आदेश मिळेपर्यंत बंद असतील. धोकादायक ठिकाणं, धबधबे, तलाव आणि नदीकाळच्या भागांमध्ये नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. महाबळेशवर, पाचगणी, ठोसेघर, भांबवली-वजराई, कोयनेतील धबधबा, कास पठार, सज्जनगड याठिकाणी बंदी घातली आहे.

नाशिक जिल्ह्यात ढगफुटीचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे या जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे बंद राहणार आहेत. दुगारवाडी धबधबा, हरिहर गड, पहिने ही ठिकाणं पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद राहणार आहेत. याशिवाय त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि सप्तश्रृंगी मंदिरसुद्धा भाविकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.