
काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात रक्ताचा तुडवडा निर्माण होत असल्याचे सांगितले होते. तोच विचार लक्षात घेऊन राष्ट्रवादीतर्फे राज्यभरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यभरातील रक्तदान शिबिरं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले जात असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

ताडदेव येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात सुप्रिया सुळे यांनी रुग्णावाहिकेचे लोकार्पण केले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

सुप्रिया सुळे यांनी राज्यातील राजकीय तसेच सामाजिक परिस्थितीवरही भाष्य केले. मराठा आरक्षण प्रश्नावर बोलताना मराठा समाजाच्या सर्व व्यथा ऐकून घेऊन राज्य सरकार काहीतरी मार्ग काढण्याचा प्रांजळ प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला.

राष्ट्रवादीतर्फे आयोजि केल्या जाणाऱ्या रक्तदान शिबिरांना चांगला प्रतिसाद लाभत असून यामध्ये महिलादेखील उत्स्फूर्तपणे रक्तदान करत आहेत.

यावेळी सुप्रिया सुळे यांनी रक्तदात्यांचे आभार मानले, तसेच त्यांचा सत्कार केला.

येत्या सोमवारी राज्यातील 20 जिल्ह्यांतून शेतकरी दिल्लीकडे कूच करणार आहेत. तेथील शेतकरी आंदोलनात भाग घेणार आहेत. यावर बोलताना, हे केंद्र सरकारचे अपयश असल्याचे सांगत सरकार शेतकऱ्यांना आधार देण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.