
बीड जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील १०० गावांमधील पाच हजार घरांवर आयसीआयसीआय बॅंकेच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मोठ्या प्रमाणावर जलसंधारण करणाऱ्या संस्थेच्या सदस्यांनी मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली.

कर्नल शशिकांत दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील मॅप्स इंडस्ट्रीज प्रा.लि.या कंपनीने ५ हजार घरांच्या छतांवर रुफ टॉप रेनवॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसवून २६ कोटी लिटर पाणी अडवण्यात यश मिळवले आहे.

त्यांच्या प्रयत्नांमुळे या गावातील पाच लाख नागरिक आता पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले असून गावाच्या भूजलपातळीतही वाढ झाली आहे. त्यांनी १०० गावांचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन याप्रसंगी करण्यात आले.

संस्थेने पुढाकार घेऊन केलेल्या या कामाबद्दल यासमयी त्यांचे कौतुक केले. तसेच हे काम अधिक व्यापक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत यावेळी बोलताना व्यक्त केले.

तसेच त्यासाठी शासकीय पातळीवर देखील नक्की प्रयत्न केले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

याप्रसंगी पर्जन्य रेन वॉटर हहार्वेस्टिंग कन्सल्टन्सीचे संचालक कर्नल शशिकांत दळवी, आयसीआयसीआय बँकेचे शरद अग्रवाल, जोखीम कोलेको आणि शैलेश झा तसेच मॅप्स इंडस्ट्रीजचे संचालक अनिरुद्ध तोडकर, पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.राजेश मणेरीकर, मॅप्स इंडस्ट्रीजचे उप व्यवस्थापक राजू तेली आणि दीपक चौधरी उपस्थित होते.