कृष्णाकाठावर अवतरली गूढ फौज, बघता बघता नदीत शिरली अन् मग… सांगलीत नेमकं काय घडलं?
सांगलीतील आमणापूर-अंकलखोप पुलावर कृष्णा नदीच्या पात्रात १५० हून अधिक पानकावळ्यांचा (Cormorants) विलोभनीय थवा अवतरला. वादळी वातावरणात निसर्गाच्या या नयनरम्य दृश्याने पक्षीप्रेमींना भुरळ घातली आहे.

निसर्गाच्या विविध छटांनी नटलेल्या कृष्णाकाठावर आज सकाळी पक्षीप्रेमींना एका विलोभनीय दृश्याचा अनुभव आला. सांगली जिल्ह्यातील आमणापूर-अंकलखोप पुलावर आज पहाटे सहाच्या सुमारास पानकावळ्यांचा (Cormorants) एक विशाल थवा जलविहारासाठी अवतरला.

सध्याच्या वादळी आणि पावसाळी वातावरणामुळे निसर्गाचे रूप पालटले आहे. मात्र अशा वातावरणात या पक्ष्यांचा मुक्त संचार कृष्णाकाठच्या समृद्ध जैवविविधतेची साक्ष देत आहे.

स्थानिक निसर्ग अभ्यासक संदीप नाझरे यांनी हे नयनरम्य दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या थव्यामध्ये सुमारे १५० ते १८० पानकावळे होते.

पावसाळी ढगांच्या पार्श्वभूमीवर हे पक्षी आकाशात शिस्तबद्ध 'V' आकारात भरारी घेताना दिसत होते. जेव्हा हा थवा संथ गतीने नदीच्या पात्रात उतरला, तेव्हा जणू आभाळच कृष्णामाईच्या कुशीत विसावत असल्याचा भास होत होता.

पानकावळे हे अत्यंत चपळ आणि उत्तम पाणबुडे मानले जातात. हे पक्षी समूहाने राहणे पसंत करतात. त्यांची शिकार करण्याची पद्धतही वैशिष्ट्यपूर्ण असते. नदीच्या पात्रात उतरल्यावर हे पक्षी माशांना चोहोबाजूंनी घेराव घालून सामूहिकरीत्या शिकार करतात.

कृष्णाकाठचा हा परिसर या पक्ष्यांसाठी अत्यंत पोषक मानला जातो. इतक्या मोठ्या संख्येने पक्ष्यांचे दर्शन होणे, हे निसर्गाची समृद्धी अद्याप टिकून असल्याचे सकारात्मक संकेत मानले जात आहेत.