वडिलांकडून कोयत्याने वार, आईने घरातून हाकललं, मुलानेही सोडलं एकटं..; ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्रीचा संघर्ष
'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्रीचं आयुष्य संघर्षाने भरलेलं आहे. लहानपणी वडिलांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केला होता, तर एकदा आईने घरातून हाकललं होतं.

'पवित्र रिश्ता'मध्ये खाष्ट सासू साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी आज वयाच्या 80 व्या वर्षीसुद्धा अभिनयक्षेत्रात सक्रिय आहेत. पडद्यावर एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारणाऱ्या उषा यांचं आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. पतीपासून विभक्त, मुलापासून दुरावा, एकटेपणा आणि लहानपणी वडिलांकडून मारहाण.. उषा नाडकर्णी यांचं आयुष्य संघर्षाने भरलेलं आहे.

उषा नाडकर्णी या गेल्या अनेक दशकांपासून मुंबईतील त्यांच्या फ्लॅटमध्ये एकट्याच राहत आहेत. आता एकटं राहण्याची सवयच झाल्याचं त्यांनी म्हटलंय. कोणाच्याही मदतीशिवाय त्या खंबीरपणे आयुष्य जगत आहेत. त्या पतीपासून खूप आधीच विभक्त झाल्या होत्या. तरीसुद्धा त्यांनी पती किंवा त्यांच्या कुटुंबीयांविरोधात मनात कटुता बाळगली नाही.

उषा नाडकर्णी यांचा एकुलता एक मुलगा परदेशात राहतो. त्या स्वत: शूटिंगमध्ये खूप व्यस्त असायच्या, म्हणून मुलाचं संगोपन त्यांच्या आईनेच केलं होतं. याच कारणामुळे त्यांचा मुलगा आजही मस्करीत त्यांना म्हणतो, "मला तू फक्त जन्म दिला आहेस, माझी खरी आई तर आजी होती."

उषा नाडकर्णी यांनी खुलासा केला आहे की त्या 1987 पासून एकट्याच राहत आहेत. सुरुवातीला त्यांना एकटं राहायची भीती वाटायची. कोणीतरी हल्ला करेल, या भीतीने त्या सिक्युरिटी गार्डला घरापर्यंत सोडायला सांगायच्या. नंतर हळूहळू त्यांना सवय झाली.

"मी कधी कधी विचार करते की जर रात्री-अपरात्री माझं निधन झालं, तर एखाद्याला याविषयी कसं समजेल? कदाचित मग शेजारचे दार वाजवून म्हणतील की, अरे म्हातारीने दरवाजा उघडला नाही", असं त्या गंमतीने म्हणाल्या.

उषा नाडकर्णी यांचं बालपणसुद्धा संघर्षमयी होतं. त्यांनी सांगितलं की त्यांचे वडील फार तापट स्वभावाचे होते. छोट्या-छोट्या गोष्टींवर ते मुलांना मारायाचे. एकदा जेव्हा त्यांनी भावाला वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा, वडिलांनी थेट त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. हाताला दुखापत झाली असतानाही त्या दुसऱ्या दिवशी रंगभूमीवर नाटकाच्या प्रयोगासाठी पोहोचल्या होत्या.

उषा नाडकर्णी यांना लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं. पण त्यांच्या आईचा त्याला विरोध होता. जेव्हा उषा यांनी अभिनयासाठी हट्ट धरला, तेव्हा त्यांच्या आईने त्यांचं सर्व सामान घरातून बाहेर फेकून दिलं होतं. तेव्हा उषा आठवडाभर एका मैत्रिणीच्या घरी राहिल्या होत्या. नंतर त्यांचे वडील त्यांना घरी परत घेऊन आले होते. सर्व अडचणींवर मात करून त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय केला.