
सध्या मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईत कोसळणाऱ्या पावसामुळे सर्वत्र जलमय स्थिती पाहायला मिळत आहे. वसईतही सध्या जोरदार पाऊस सुरु असून अनेक नागरी वस्तीत पाणी शिरले आहे.

वसईतील कामन चिंचोटी परिसरातील आशा नगर, कुताडीपाडा आणि साईनगरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या तीन वसाहतींमधील सुमारे १०० हून रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

हे पाणी घरात शिरल्यामुळे लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले. या १०० रहिवाशांना जवळच्या अंगणवाडी आणि जॉन स्कूलमध्ये तात्पुरत्या निवासासाठी हलवण्यात आले आहे.

प्रशासनाने या नागरिकांसाठी जेवणाची आणि इतर आवश्यक सोयीसुविधांची व्यवस्था केली आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली आहे. यामुळे पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे

याचबरोबर वसईतील मिठागर वसाहतीतही अनेक रहिवासी पुराच्या पाण्यात अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने बोटींची व्यवस्था केली आहे. सध्या या ठिकाणी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.

वसईतील पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. स्थानिक नागरिक आणि बचाव पथके एकत्रितपणे काम करत आहेत, अशी माहिती आयुक्तांनी दिली आहे.