
रोज सकाळी उठायचं आणि समुद्रात बोट घेऊन जायचं. शांत किनाऱ्यावरून जाताना मन प्रसन्न व्हायचं. पण मागचे 10 दिवस मच्छिमारांसाठी आक्रीत घडणारे ठरले आहेत. वसईच्या या शांत समुद्रात त्यांनी जे काही पाहिलं त्याने त्यांचे डोळे विस्फारले. डोकं चक्रावलं. काय घडतंय ते काहीच कळत नव्हतं. एक मच्छिमार तर आपली बोट घेऊन अक्षरश: जीव वाचवून बाहेर आला. मोठं काही तरी घडणार या भीतीने सर्व मच्छिमारांच्या पोटात गोळा आला आहे. बोट घेऊन समुद्रात जायलाही हे मच्छिमार धजावत नाहीये.

वसईच्या समुद्र किनाऱ्यापासून 66 नॉटिकल अंतरावर मागील 10 दिवसांपासून समुद्रात गोल रिंगण तयार झाले असल्याचे दिसून आले आहे. गेल्या 10 दिवसांपासून समुद्रात हे रिंगण दिसत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. रिंगण का दिसत आहे? त्यामुळे काय होणार? याची भीती या मच्छिमारांमध्ये निर्माण झाली आहे. यापूर्वी समुद्रात कधीच असं घडलं नव्हतं. मग आता हे कसले संकेत आहेत? असा प्रश्न या मच्छिमारांना पडला आहे.

मच्छिमारी करून परत घरी येत असताना वसईच्या मच्छिमारांना ही घटना दिसून आली आहे. यामुळे मच्छिमार बांधवांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वच मच्छिमारांमध्ये ही माहिती पोहोचली असून जो तो या रिंगणाचीच चर्चा करताना दिसत आहे. गावातील प्रत्येकजण याबाबतचे वेगवेगळे अंदाज वर्तवत आहे.

विशेष म्हणजे वसईतील बोट याच गोल रिंगणमध्ये अडकली होती. बऱ्याच प्रयत्नानंतर सुदैवाने ती बोट त्या रिंगणमधून बाहेर पडली. त्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, बोट रिंगणमध्ये अडकण्याचा अनुभव भयंकर होता असं या मच्छिमाराने सांगितलं. हे पाण्याचं रिंगण आहे. समुद्रात भोवरा असतो तसं हे रिंगण होतं. पण भोवरा परवडला पण हे रिंगण अति भयानक आहे, असं सांगितलं जात आहे.

दरम्यान, समुद्रात हे रिंगण कशामुळे पडलं असेल? का पडलं? त्यामागचं कारण काय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. प्रत्येकजण त्याबाबतचे वेगवेगळे कयासही लावत आहे. हा ज्वालामुखी असल्याचा अंदाज मच्छिमार व्यक्त करत आहेत. तर काहींच्या मते त्सुनामी तर येणार नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे.

पालघर जिल्हा हा भूकंपप्रवण क्षेत्र आहे. या जिल्ह्यात दरवर्षी 200 हून अधिक सौम्य भूकंप होतात. त्यामुळे हे अंदाज वर्तवले जात आहेत. मोठी आपत्ती येण्यापूर्वीच आपत्ती विभागाने या घटनेची तपासणी करावी, अशी मागणी समुद्र जीवरक्षक जनार्दन मेहेर यांनी केली आहे.