
विदर्भ म्हटला की आपल्या डोळ्यासमोर येतात ती पारंपरिक पिके. मात्र, वाशिम जिल्ह्यातील शेलू खडसे येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने हा पारंपरिक विचार मोडून काढत नारळाची यशस्वी शेती केली आहे. यामुळे एक नवा आदर्श उभा राहिला आहे.

रमेश त्र्यंबक धामोडे या शेतकऱ्याने आपल्या एका एकर क्षेत्रात तब्बल ५०० नारळाच्या झाडांची लागवड केली आहे. त्यामुळे विदर्भात कोकण साकारल्याचे बोललं जात आहे. वाशिम जिल्ह्यासाठी हा एक अगदीच पहिला आणि अनोखा प्रयोग मानला जात आहे.

नारळ हे पीक मुख्यतः कोकण विभागातील पोषक हवामानातच घेतले जाते. पण वाशिमसारख्या कोरडवाहू आणि उष्ण हवामानातही नारळ शेती करणे शक्य आहे हे रमेश धामोडे यांनी त्यांच्या यशस्वी प्रयोगातून सिद्ध करून दाखवलं आहे.

रमेश धामोडे यांनी सुरुवातीला मोठ्या हिंमतीने १०० नारळाच्या झाडांची लागवड करून या प्रयोगाची सुरुवात केली. शेताच्या बांधावर लावलेल्या या झाडांची त्यांनी योग्य आणि नियमित काळजी घेतली.

पाण्याची योग्य व्यवस्था आणि नियमित देखभाल यामुळे या झाडांची वाढ खूप चांगली झाली. त्यांच्या या मेहनतीला पाचव्या वर्षी फळ मिळाले. केवळ १०० झाडांपासून त्यांना त्यावर्षी सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचे चांगले उत्पन्न मिळाले.

या पहिल्या प्रयोगातील यशामुळे धामोडे यांचा आत्मविश्वास खूप वाढला. यामुळेच त्यांनी आता एका एकर क्षेत्रात आणखी ५०० नारळाच्या झाडांची लागवड केली आहे. सध्या ही झाडं तीन वर्षांची झाली आहेत.

पुढील दोन वर्षांत या झाडांपासून उत्पादन मिळण्यास सुरुवात होईल, असा त्यांचा अंदाज आहे. या ५०० झाडांपासून त्यांना सुमारे १० लाख रुपयांचं निव्वळ उत्पन्न मिळेल, असा विश्वास रमेश धामोडे यांनी व्यक्त केला आहे.

रमेश धामोडे यांचा हा यशस्वी प्रयोग विदर्भातील इतर शेतकऱ्यांसाठी एक नवा मार्ग दाखवणारा ठरला आहे. पारंपरिक शेतीच्या बंधनातून बाहेर पडून प्रयोगशीलता स्वीकारल्यास शेतकऱ्यांचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं, हे धामोडे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. तसेच कोकणातील पिकं आता विदर्भातही चांगल्या प्रकारे फुलू शकतात, हे त्यांच्या नारळ शेतीने सिद्ध केले आहे.