
माजी आदिवासी विकास मंत्री, भाजपचे नेते विष्णू सवरा यांचे बुधवार दिनांक 9 डिसेंबर रोजी वयाच्या 70व्या वर्षी निधन झालं. हॉलीबॉल खेळाडू, बँक अधिकारी ते यशस्वी राजकारणी असा त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा आलेख राहिला आहे. मितभाषी पण सर्वांशी मिळून वागणारा नेता, दांडगी स्मरशक्ती असलेला नेता आणि गोरगरिबांच्या, आदिवासींच्या उत्थानासाठी अहोरात्र झटणारा नेता म्हणूनही ते सर्वपरिचित होते.

वाणिज्य शाखेतून पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियात नोकरी पत्करली. मोठ्या पगाराची नोकरी असली तरी या नोकरीत ते दीर्घकाळ रमले नाहीत. त्यांनी 1980मध्ये बँकेतील नोकरी सोडली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याला त्यांनी वाहून घेतले.

सवरा यांना खेळाची प्रचंड आवड होती. ते स्वत: उत्तम व्हॉलीबॉल खेळाडू होते. त्यांनी त्यांच्या मतदारसंघात आमदार चषकाच्या माध्यमातून क्रीडा स्पर्धा सुरू करून नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन दिलं. त्यामुळे आदिवासी पाड्यातील या विद्यार्थ्यांना नवं प्लॅटफॉर्म मिळालं. त्यातील शेकडो खेळाडूंना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधीही मिळाली.

संघात आल्यानंतर त्यांनी भाजपमध्येही कामाला सुरुवात केली. सुरुवातीला आदिवासी आघाडीचे अध्यक्ष, प्रदेश सचिव अशी जबाबदारी त्यांनी सांभाळली. त्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी आदिवासी पाड्यात मोठं काम केलं. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांनी आदिवासी विकास मंत्री म्हणून काम केलं. त्यांनी मंत्रिपदाची सूत्रे हाती घेताच अनेक प्रश्न मार्गी लावले. खासकरून आदिवासी विद्यार्थ्यांच्या आश्रम शाळेचा प्रश्न त्यांनी आस्थेवाईकपणे हाताळला. धडाकेबाजपणे काम करणारा मंत्री म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते.

दोनदा पराभव झाल्यानंतर सवरा यांनी पुन्हा एकदा मतदारसंघाची बांधणी सुरू ठेवली. त्यानंतर 1990, 1995, 1999 आणि 2004च्या चारही विधानसभा निवडणुकीत त्यांना भरघोस यश मिळाले. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर 2009मध्ये त्यांनी भिवंडी ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवून विजयी परंपरा कायम ठेवली. 2014मध्येही विक्रमगड मतदारसंघातूनही ते विजयी झाले. सवरा यांनी सुमारे ३० वर्ष विधिमंडळात प्रतिनिधीत्त्व केले. विधिमंडळाचे एवढ्या दीर्घ काळ प्रतिनिधीत्व करणारे कदाचित ते एकमेव आदिवासी नेते असतील. 1990, 1995, 1999, 2004, 2009 आणि 2014 असे सलग सहा वेळा ते निवडून आले.