
खाण्याचे शौकीन असलेल्या लोकांमध्ये नेहमीच एक वाद सुरू असतो तो म्हणजे पुलाव आणि बिर्याणी एकच आहेत की वेगवेगळ्या? अनेकदा मांसाहार न करणारे लोक बिर्याणीलाच पुलाव म्हणतात. ज्यामुळे खऱ्या बिर्याणीप्रेमींना थोडासा राग येतो.

पण खरं सांगायचं तर, हे दोन्ही पदार्थ दिसायला सारखे असले, तरी ते बनवण्याच्या पद्धती, वापरले जाणारे मसाले आणि त्यांची चव यात खूप मोठा फरक आहे. या दोन लोकप्रिय पदार्थांमध्ये नेमका काय फरक असतो, हे आज आपण जाणून घेऊया.

बिर्याणी आणि पुलाव बनवण्याची प्रक्रिया पूर्णपणे वेगळी आहे. पुलाव बनवणं हे तुलनेने सोपं आहे. यात तांदूळ आणि भाज्या किंवा मांस एकाच भांड्यात एकत्र शिजवले जातात. ही पद्धत कमी वेळात आणि कमी श्रमात होते. पुलाव हा मध्यम आचेवर शिजवला जातो आणि त्यात जास्त मसाल्यांचा वापर होत नाही, ज्यामुळे त्याची चव सौम्य आणि हलकी असते.

पण बिर्याणी बनवणं हे एक कला आहे, ज्यात खूप संयम आणि मेहनत लागते. यात तांदूळ आणि मांस (चिकन किंवा मटण) किंवा भाज्या आधी वेगवेगळ्या शिजवल्या जातात. मांस मसाल्यांमध्ये मॅरीनेट करून शिजवले जाते.

हे दोन्ही पदार्थ दिसायला सारखे असले तरी चवीत जमीन-अस्मानाचा फरक असतो. याचे मुख्य कारण म्हणजे मसाल्यांचा वापर करणे असा आहे. पुलावमध्ये मोजकेच आणि हलके मसाले वापरले जातात. जिरे, लवंग, दालचिनी आणि वेलची यामुळे पुलावची चव सौम्य आणि सुगंधी असते.

बिर्याणी म्हणजे मसाल्यांची राणी असते. यात लवंग, दालचिनी, वेलची, केशर, दगडफूल, जायफळ, आणि मिरी यांसारखे अनेक मसाले भरपूर प्रमाणात वापरले जातात. या मसाल्यांमुळे बिर्याणीला एक खास सुगंध आणि मसालेदार चव येते. अनेक प्रकारच्या बिर्याणीमध्ये तळलेला कांदा, साजूक तूप आणि केशरचा वापर केल्याने तिचा स्वाद आणखी वाढतो.

बिर्याणी आणि पुलाव यातील अजून महत्त्वाचा फरक म्हणजे ज्यामुळे हे दोन्ही पदार्थांना वेगळे असल्याचे पाहायला मिळते. पुलावमध्ये कोणताही थर नसतो. तांदूळ आणि भाज्या किंवा मांस सुरुवातीपासूनच एकत्र शिजतात.

पण बिर्याणीमध्ये थर असतात. मांस किंवा भाज्यांचा थर, त्यावर भाताचा थर आणि पुन्हा मांस किंवा भाज्यांचा थर असे थर एकावर एक रचले जातात. या थरांमुळे प्रत्येक घासात वेगवेगळी चव आणि पोत जाणवतो.

पुलाव आणि बिर्याणी दोन्ही आशियातील लोकप्रिय पदार्थ असले तरी त्यांचे मूळ वेगवेगळे आहे पुलाव हा मध्य आशिया आणि तुर्कस्तानमधून भारतात आला असे मानले जाते. तो एक साधा पण चविष्ट पदार्थ आहे, जो अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात खाल्ला जातो.

बिर्याणीचा इतिहास अधिक भव्य आहे. असे मानले जाते की, ती मुघलांच्या काळात भारतात आली. त्यांच्या शाही स्वयंपाकघरात तिचे वेगवेगळे प्रकार तयार झाले. हैदराबादची दम बिर्याणी तर जगप्रसिद्ध आहे, जी तिच्या खास चवीसाठी आणि दमदार प्रक्रियेसाठी ओळखली जाते.