
भारत हा विश्वातील सर्वांत विविधतापूर्ण देश आहे. इथल्या विविध राज्यांमधील लोकांचं राहणीमानसुद्धा वेगवेगळं आहे. भारतात काही लोक पर्वत क्षेत्रात राहतात, तर काही जण मैदानी क्षेत्रात राहतात. काही जण अत्यंत थंड प्रदेशात राहतात, तर काही उष्ण हवामानाच्या प्रदेशात राहतात. म्हणूनच देशभरातील लोकांच्या आनंदी जीवनाचं स्तरसुद्धा वेगवेगळं आहे.

विविध सर्वेक्षण आणि रिपोर्ट्समध्ये ही बाब समोर आली आहे की भारतातील सर्वांत आनंदी राज्यांमध्ये जीवनाची गुणवत्ता, समाजाची स्थिती, आर्थिक स्थिरता, समृद्ध संस्कृती आणि उत्तम पर्यावरण हे सर्व पहायला मिळतंय. तर कमी आनंदी असलेल्या राज्यांमध्ये गरीबी, नैसर्गिक आपत्ती किंवा सामाजिक अस्थिरता अशी परिस्थिती आहे.

नुकतंच 'हॅपीप्लस कंसल्टिंग'कडून 'इंडियन हॅपीनेस इंडेक्स रिपोर्ट आणि सर्वेक्षणा'चे अहवाल जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये भारतातील टॉप 10 आनंदी राज्यांची यादी आहे. हा अहवाल जीवनातील समाधान, भावनिक स्वातंत्र्य, समर्थन गट, निवडीचे स्वातंत्र्य आणि उदारता या निकषांवर आधारित आहे.

या रिपोर्टनुसार, हिमाचल प्रदेश हे भारतातील सर्वांत आनंदी राज्य आहे. हिमाचलची नैसर्गिक सुंदरता आणि लोकांमधील घनिष्ठ संबंध हे इथल्या लोकांच्या आनंदाचं प्रमुख कारण आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहणं हेसुद्धा इथल्या लोकांच्या आनंदी जीवनाचं मुख्य कारण आहे.

भारतातील सर्वांत आनंद राज्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर मिझोरम हे राज्य आहे. तिसऱ्या क्रमांकावर अंदमान आणि निकोबार, चौथ्या स्थानी पंजाब, पाचव्या स्थानी गुजरात आणि सहाव्या क्रमांकावर सिक्कीम आहे.

या यादीत सातव्या क्रमांकावर पुद्दुचेरी, आठव्या स्थानी अरुणाचल प्रदेश, नवव्या क्रमाकांवर केरळ आणि दहाव्या क्रमांकावर मेघालय आहे. आर्थिक स्थिरता, सांस्कृतिक समृद्धी आणि नैसर्गिक सुंदर ही यांच्या आनंदाची मुख्य कारणं आहेत.

हॅपीप्लस कंसल्टिंगच्या 'इंडियन हॅपीनेस इंडेक्स रिपोर्ट'मध्ये उत्तर प्रदेश हे देशातील सर्वांत कमी आनंदी राज्य असल्याचं म्हटलं गेलंय. इथले सामाजिक आणि आर्थिक मुद्दे यासाठी कारणीभूत असल्याचं त्यात नमूद केलंय.