शेतकऱ्याचा नाद खुळा : वऱ्हाड थेट बैलगाडीतून लग्नस्थळी, नेमकं काय कारण?
अमरावती : शेतकरी राजा कधी काय करेल याचा नियम नाही. काळाच्या ओघात काहीही बदल झाले तरी बैलजोडी आणि शेतकऱ्याचं नातं हे वेगळेच आहे. सध्याच्या वाढत्या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्याने वेगळाच नाद केला आहे. मुलाच्या लग्नाचे वऱ्हाड थेट बैलगाडीतून समारंभ ठिकाणी मार्गस्थ केले आहे. अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव येथील शेतकऱ्याने मुलाच्या लग्नाची वरात ही बैलगाडीतून काढली आहे. शिरजगाव ते अनकवाडी असा 10 किमीचा प्रवास करुन हे वऱ्हाड लग्न समारंभाच्या ठिकाणी पोहचले होते. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती उत्पादनात मोठी घट झाली आहे. असे असले तरी दुसरीकडे इंधनाच्या दरात वाढ होत असल्याने शेतकऱ्याने ही नामी शक्कल लढवली आहे. सध्या या वऱ्हाडाची मोठी चर्चा रंगली आहे.

ही बाब अभिमानास्पद : शेतकऱ्यांकडे काही नसले तरी आपली हक्काची बैलजोडी ही असतेच. त्याचा कायम अभिमान वाटायला हवा. आज आनंदाचा दिवस असल्याने आपल्या आनंदात बैलजोडीचाही सहभाग महत्वाचा आहे. शिवाय वाढत्या इंधन दरवाढीचा ज्वलंत प्रश्न असल्याने गावचे वऱ्हाड बैलगाडीतून आणले असल्याचे विशालने सांगितले.

एकच चर्चा: 10 किमी प्रवास करुन नवरदेवासह हे वऱ्हाड लग्न मंडपी पोहचल्यानंतर या अनोख्या पध्दतीची एकच चर्चा सुरु झाली आहे. आज-काल मोठ-मोठ्या अलिशान गाड्यांमधून वरात काढली जाते पण बैलगाडीतून निघालेल्या वरातीची चर्चा अनकवाडीत रंगली होती.

खर्चही टळला : लग्न म्हटलं तर, अवाढव्य खर्च सगळे करताना आपण पाहत असतो. मात्र या महागाईच्या युगात शेतकऱ्याचं घरच लग्न हे अगदी साध्या पद्धतीने होत असल्याचे दिसून येते. सध्या या अनोख्या वरातीची चर्चा संपूर्ण अमरावती होत आहे इंधन दरवाढीवरून या शेतकऱ्याच्या मुलाने नामी उपाय शोधला आहे.

बैलगाडीतून 10 किमीचा प्रवास: वाढत्या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी शिरजगाव येथील विशाल कांबळे यांनी थेट बैलगाडीतून वऱ्हाड लग्न स्थळी मार्गस्थ केले होते. शिरजगाव ते अनकवाडी हा 10 किमीचा प्रवास बैलगाडी केल्याने हे वऱ्हाड अनेकांचे लक्ष वेधून घेत होते.