मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगतापच का? ‘ही’ आहेत 5 कारणं

| Updated on: Dec 19, 2020 | 9:59 PM

मुंबई : काँग्रेसने मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी (Mumbai Congress President) विधान परिषदेचे आमदार भाई जगताप (Bhai Jagtap) यांची निवड केली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी जगतापांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. मात्र, या पदावर भाई जगताप यांचीच निवड का असा प्रश्न अनेकांना पडत आहे. काँग्रेस वरिष्ठांकडून झालेल्या या निवडीमागे महत्वाची 5 कारणं असल्याची चर्चा आहे. यामुळेच […]

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगतापच का? ही आहेत 5 कारणं
Follow us on

मुंबई : काँग्रेसने मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी (Mumbai Congress President) विधान परिषदेचे आमदार भाई जगताप (Bhai Jagtap) यांची निवड केली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी जगतापांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. मात्र, या पदावर भाई जगताप यांचीच निवड का असा प्रश्न अनेकांना पडत आहे. काँग्रेस वरिष्ठांकडून झालेल्या या निवडीमागे महत्वाची 5 कारणं असल्याची चर्चा आहे. यामुळेच या पदाच्या शर्यतीत असणाऱ्या इतर नेत्यांना मागे टाकत जगताप यांनी बाजी मारली आहे ( 5 reasons behind selection of Bhai Jagtap as Mumbai Congress President)

1. मुंबई पालिका निवडणूक

यंदा भाजपने शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नाकावर टिच्चून महानगरपालिकेची निवडणूक जिंकायचीच, असा चंग बांधला आहे. नुकत्याच झालेल्या भाजपच्या कार्यकारिणी बैठकीनंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवण्याचा एल्गार केलाय. भाजपने त्याची तयारी आत्तापासूनच सुरु केली आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेही आपली रणनीती आखण्यास सुरुवात केलीय. याचाच भाग म्हणून मुंबई काँग्रेसमधील गटबाजीला आळा घालत पक्षात नवा उत्साह आणण्यासाठी भाई जगताप यांची निवड झाली आहे. भाई जगताप हे वादापासून दूर आणि सर्वांशी चांगले संबंध असलेले नेते आहेत. त्यामुळे याचा काँग्रेसला बीएमसी निवडणुकीत उपयोग होईल, असाही अंदाज बांधला जात आहे.

2. मराठमोळा चेहरा

मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदावर संजय निरुपम यांच्या नियुक्तीवरुन काँग्रेसवर कायमच अमराठी नेत्याची नियुक्ती केली म्हणून टीका होत राहिलीय. मात्र, आता तोंडावर बीएमसी निवडणुका असल्याने काँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे. त्यातच भाजपानेही आगामी मुंबई पालिका निवडणुकीसाठी मराठमोळ्या अतुल भातखळकरांकडे जबाबदारी दिली. त्यामुळे आता काँग्रेसनेही भाई जगताप यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड करून मराठी चेहरा देण्याचा प्रयत्न केलाय. यामुळे आगामी मुंबई पालिका निवडणूक मराठीच्या मुद्द्यावर झाल्यास काँग्रेसला याचा फायदा होऊ शकणार आहे.

3. एकदम नवं नाव

याआधी वर्षानुवर्षे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कधी मिलिंद देवरा, कधी गुरुदास कामत, तर कधी एकनाथ गायकवाड यांचीच आलटून पालटून निवड होत आलीय. त्यामुळे या सर्वांविषयी एक प्रकारची पक्षांतर्गत नाराजीही कार्यकर्त्यांमध्ये होती. या सर्वांचे आपले स्वतंत्र गटही होते. त्यामुळे या गटबाजीचा फटका काँग्रेसला अनेक ठिकाणी बसल्याचंही पाहायला मिळालं. विद्यमान अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड (Eknath Gaikwad) यांच्याविषयी देखील पक्षांतर्गत नाराजी वाढल्याची चर्चा होती. त्यामुळे या जागेवर ही परिस्थिती हाताळू शकेल आणि कार्यकर्त्यांची नाराजी नसेल असा नेता येणं आवश्यक होतं. यासाठी भाई जगताप अगदी योग्य ठरले. त्यांचा एकमद नवा चेहरा काँग्रेसला नवी उर्जा देईल, अशी आशा काँग्रेस पक्ष श्रेष्ठींना आहे.

4. सेनेशी जवळीक राहील

कामगार युनियनचे नेते राहिलेल्या भाई जगताप यांची निवड मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावर केल्याने काँग्रेसला शिवसेनेशी जवळीक ठेवता येणार आहे. भाई जगताप शिवसेनेशी संवाद ठेवण्यात आणि पक्षाला उपयोगी निर्णय घेण्यात उपयोगी ठरतील, असाही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा विचार असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे मुंबईत दोन्ही पक्षातील संबंध सुधारुन याचा एकूणच आगामी राजकीय घडामोडींवर सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा काँग्रेसला आहे.

5. कोणत्याच वादात नाही

भाई जगताप हे वादांपासून दूर असलेले काँग्रेस नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या निवडीमुळे काँग्रेसला नवी ओळख मिळेल. त्यांच्या या वादापासून दूर राहण्याच्या वैशिष्ट्यामुळे काँग्रेसला आपली प्रतिमा सुधारुन आगामी बीएमसी निवडणुकीत कामगिरी सुधारता येईल, असाही विचार काँग्रेस नेत्यांनी केलेला दिसतोय. एकूणच काँग्रेसने यावेळी आगामी काळातील सर्व राजकीय घडामोडींचा विचार करुन भाई जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलाय.

हेही वाचा :

Bhai Jagtap | मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड

Bhai Jagtap | मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड?

मुंबई कुणाची ? गायकवाड, जगताप की आणखी कोण ?

5 reasons behind selection of Bhai Jagtap as Mumbai Congress President