अध्यक्ष झाल्यानंतर राहुल गांधींनी जर सांगितलं, तर महाराष्ट्रातील सत्ता सोडू : विजय वडेट्टीवार

| Updated on: Aug 24, 2020 | 10:50 AM

अध्यक्ष झाल्यावर राहुल गांधींनी सरकारमधून बाहेर पडण्यास सांगितल्यास आम्ही सत्ता सोडू,असं विजय वडेट्टीवार म्हणाले. (Vijay Wadettiwar on CWC and Rahul Gandhi)

अध्यक्ष झाल्यानंतर राहुल गांधींनी जर सांगितलं, तर महाराष्ट्रातील सत्ता सोडू : विजय वडेट्टीवार
Follow us on

नागपूर : काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सोनिया गांधी यांच्यानंतर राहुल गांधी यांना पसंती आहे. सोनिया गांधी यांनी संकटात काँग्रेसला सांभाळलं आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांना पसंती आहे, असं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. (Vijay Wadettiwar on CWC and Rahul Gandhi)

गांधी परिवारातील व्यक्ती राष्ट्रीय अध्यक्ष व्हावा. राहुल गांधी यांनी चर्चा करुन महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारला होकार दिला होता. अध्यक्ष झाल्यावर राहुल गांधी यांनी सरकारमधून बाहेर पडण्यास सांगितल्यास आम्ही सत्ता सोडू. काँग्रेसजन म्हणून आम्ही हायकमांडच्या निर्णयासोबत आहोत, असंही यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले. (Vijay Wadettiwar on CWC and Rahul Gandhi)

काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरुन वादावादी
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी असलेल्या सोनिया गांधी यांनी पद स्वीकारुन वर्ष होत आहे. काँग्रेस कार्यकारिणी अर्थात CWC बैठक आज होत आहे. या बैठकीत सोनिया गांधी राजीनामा देण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरुन गट पडले आहेत. एका गटाची मागणी ही सोनिया गांधी अध्यक्षपदी राहाव्या, तर दुसऱ्या गटाने राहुल गांधींनी अध्यक्षपद स्वीकारावे अशी मागणी केली आहे. काँग्रेसचं अध्यक्षपद गांधी घराण्याकडेच रहावं यासाठी काँग्रेसच्या कार्यकारिणीचे सदस्य आग्रही आहेत.

काँग्रेसच्या 23 नेत्यांचं पत्र 

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना 23 नेत्यांनी पक्षाच्या पुनर्रचनेबाबत पत्र पाठवले आहे. काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष हवा असं या पत्रात म्हटलं आहे. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांचा समावेश असल्याचे बोललं जातं आहे.पंजाबमधून गांधी परिवाराबाहेरील अध्यक्ष निवडण्यास विरोध करण्यात आला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी याबाबत विरोध केला आहे.

पक्षाचे नेतृत्व गांधी घराण्याकडे असेल तर भाजपविरोधात लढता येईल : सुनील केदार

“काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे मी मनापासून समर्थन करतो. मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा यांनी गांधी घराण्याच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणे हे लज्जास्पद आहे. त्यांनी त्यांच्या या कृत्याबद्दल तातडीने माफी मागितली पाहिजे. अन्यथा काँग्रेस कार्यकर्ते त्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाहीत”, असं ट्विट राज्याचे दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी केलं.

राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर सोनियांकडे अध्यक्षपद

सोनिया गांधी 14 मार्च 1998 पासून 16 डिसेंबर 2017 पर्यंत काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा होत्या. त्यानंतर राहुल गांधी यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. राहुल गांधी यांनी दोन वर्ष अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. मात्र, गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या आग्रहानंतर सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली.

(Vijay Wadettiwar on CWC and Rahul Gandhi)

संबंधित बातम्या  

पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरांनी प्रश्न उपस्थित करणे लज्जास्पद, सुनील केदार यांचा हल्लाबोल

CWC Meeting : पक्षाच्या कार्यकारणीची आज बैठक, काँग्रेसची धुरा कोणाच्या हातात? काँग्रेस नेत्यांचं मत काय?

 सोनिया गांधी अंतरिम अध्यक्षपदाचा राजीनामा देणार?